निकाल देण्यास २ मास विलंब झाल्याने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याकडून पक्षकरांची क्षमायाचना

नवी देहली – एका प्रकरणाच्या निकालासाठी २ मास विलंब झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी १० जानेवारी या दिवशी पक्षकारांची क्षमा मागितली. निकालासाठी विलंब का झाला ? याचे कारणही त्यांनी पक्षकारांना सांगितले. निकाल देण्यास विलंब झाल्यामुळे न्यायमूर्तींनी क्षमा मागण्याचे देशातील हे कदाचित् पहिलेच उदाहरण आहे.


चंडीगडमधील पक्षकाराच्या घराच्या संदर्भातील याचिकेवर न्यायमूर्ती गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठाने ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी निकाल राखीव ठेवला होता, तो १० जानेवारी या दिवशी दिला. या वेळी न्यायमूर्ती गवई म्हणाले की, या निकालास विलंबामुळे प्रथम आपली क्षमा मागतो. या खटल्यात कायद्यातील नियम, तथ्य, तरतुदी यांविषयीच्या गोष्टींचा मला अभ्यास करावा लागला, त्यामुळे वेळ लागला.