हत्या आणि आत्महत्या करण्यापेक्षा समुपदेशन घ्या ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

कांदोळी येथे वडिलांनी मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याचे प्रकरण

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १० जानेवारी (वार्ता.) – दुसर्‍यांचा जीव घेऊन आत्महत्या करणार्‍यांनी असे पाऊल उचलतांना प्रथम विचार करायला हवा. त्यांनी समुपदेशन घ्यायला हवे. कांदोळी येथे ७ जानेवारी या दिवशी घडलेली घटना दुर्दैवी आहे. अशा घटना रोखण्यासाठी सरकार विविध मार्गांनी सातत्याने प्रयत्न करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

कांदोळी येथे ज्यो फर्नांडिस यांनी एन्नालीस आणि जोजफ या दोन मुलांची गळा आवळून हत्या केली आणि स्वत:ही आत्महत्या केली होती. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेने संपूर्ण गोव्यात खळबळ माजली होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘कांदोळी येथील घटनेविषयी मला पुष्कळ दु:ख झाले. दुसर्‍याचा जीव घेतांना अशा व्यक्तीने एकदातरी विचार करायला हवा होता. कांदोळीसारखी घटना घडू नये, यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी राज्यातील अनेक भागांत समुपदेशन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. पती-पत्नी किंवा कौटुंबिक वाद सोडवण्याचीही सरकारने व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुसर्‍यांचा जीव घेऊन स्वत:चेही जीवन संपवत असतांना प्रथम गांभीर्याने विचार करणे आणि त्याआधी सरकारने दिलेल्या पर्यायांचा लाभ घेणे महत्त्वाचे आहे.’’

गोव्यातील आत्महत्यांचे सरासरी प्रमाण राष्ट्रीय सरासरी प्रमाणापेक्षा अधिक आहे. गोव्यातील प्रमाण वर्ष २०१९ मध्ये १६.८ टक्के आणि वर्ष २०२१ मध्ये १९ टक्के होते, तर राष्ट्रीय स्तरावर हे प्रमाण अनुक्रमे १०.४ टक्के आणि १२ टक्के होते.

संपादकीय भूमिका

कौटुंबिक कलह, हत्या, आत्महत्या आदी मनाशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी समाजाला आध्यात्मिक साधना शिकवणे आवश्यक !