महाराष्ट्रातील ३ साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान !

डावीकडून साहित्यिक पवन नालट, मक़सूद आफ़ाक़ आणि श्रुती कानिटकर

नवी देहली – महाराष्ट्रातील ३ युवा साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठित ‘युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. येथील कमानी सभागृहात युवा साहित्यिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक आणि प्रमुख पाहुणे प्रसिद्ध साहित्यिक ममता कालिया उपस्थित होते. कार्यक्रमात एकूण २४ भाषेसाठी ‘युवा साहित्यिकांना वर्ष २०२२ चा’ साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील ३ युवा साहित्यिकांचा समावेश आहे.

मराठी भाषेसाठी युवा साहित्यिक पवन नालट यांना ‘मी संदर्भ पोखरतोय’ या काव्य संग्रहासाठी ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. नालट हे मूळचे अमरावती येथील असून ते शिक्षक आहेत. त्यांच्या याच कवितासंग्रहाला ‘के.बी. निकुंब काव्यसंग्रह’ पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा ‘नवोदित साहित्य लेखना’चा पुरस्कार, तसेच ‘डॉ. किसनराव पाटील वाङ्.मय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलेले आहे.

‘श्रीमतीचरित्रम्’ या संस्कृत काव्यसंग्रहासाठी श्रुती कानिटकर यांना पुरस्कार !

मुंबईच्या श्रुती कानिटकर यांना त्यांच्या संस्कृत भाषेतील ‘श्रीमतीचरित्रम्’ या काव्यसंग्रहासाठी ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रुती कानिटकर म्हणाल्या की, राधा-कृष्ण प्रेम हे सर्व परिचित आहे. कृष्णाविषयी सर्वांना माहिती आहे; मात्र राधेविषयी अल्प लोकांना माहिती आहे. ‘राधा’ या चरित्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या काव्यसंग्रहात करण्यात आला आहे. हे काव्य ७ विभागांत आहे. प्रत्येक भागाला ‘लीला’ असे नाव देण्यात आलेले आहे. यात प्रेम आणि भक्ती व्यक्त करण्यात आली आहे.
श्रुती कानिटकर या आयआयटी मुंबई येथे साहाय्यक प्राध्यापक आहेत. त्या वेदांतमध्ये पी.एच्.डी करत आहेत. श्रुती यांनी वयाच्या ११ वर्षांपासून लेखनाला प्रारंभ केला. त्यांच्या श्रीमतीचरित्रम् (कविता संग्रह), सुभाषित – रत्नभांडागारम् (मराठीतील अनुवादाला) श्रीपाद सेवा मंडळ काव्य लेखन स्पर्धेमध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे.