गडदुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी सरकारने धडक मोहीम उघडावी ! – छत्रपती संभाजीराजे भोसले

छत्रपती संभाजीराजे भोसले

कोल्हापूर – प्रतापगड येथील अफझलखानाच्या कबरीवर अतिक्रमण करून सरकारी भूमीवर नियंत्रण मिळवले होते. न्यायालयाने अनेकवेळा आदेश देऊनही हे अतिक्रमण काढण्याचे धाडस आजपर्यंतच्या कोणत्याच सरकारने दाखवले नव्हते. शिवप्रतापदिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करत खानाच्या कबरीवरील अतिक्रमण काढण्यात आले. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक करावे तितके थोडे आहे. आता यापुढील काळात सरकारने गडदुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी धडक मोहीम उघडावी, अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

१. सरकारच्या या कार्यवाहीने एक चांगला प्रारंभ झाला आहे. केवळ प्रतापगडच नव्हे, तर शिवरायांच्या अनेक गडांना या अतिक्रमणाच्या व्याधीने ग्रासलेले आहे. विशाळगड हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. लोहगड, मलंगगड, चंदन-वंदन सारख्या अनेक गडांवरही अलीकडच्या काळात अतिक्रमण वाढत आहे. यंत्रणांनी हेतूपुरस्सर डोळेझाक केल्यामुळे या गडदुर्गांच्या गौरवशाली इतिहासावर आघात होत आहे.

२. काही मासांपूर्वी रायगडावर दर्गा उभारण्याचा प्रकार शिवभक्तांच्या पाठिंब्याने आम्ही तो हाणून पाडला होता. आम्हाला रायगडावर जगदीश्वराच्या मंदिराची साधी डागडुजी करायची असली, तरी अनुमती आणण्यासाठी देहलीत ५० बैठका घ्यावा लागतात आणि इतके करूनही अनुमती मिळत नाही. इतरांना हे नियम लागू होत नाहीत का ? हा उद्दामपणा मोडून काढण्याच्या दिशेने सरकारने पहिले पाऊल टाकले आहे, याबद्दल सर्व शिवभक्तांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अभिनंदन !

३. या धाडसी निर्णयामुळे आता शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. केवळ इतक्यावरच न थांबता राज्यातील प्रत्येक गडावर झालेली अशी अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे सरकारने धडक मोहीम उघडून पाडावीत. या मोहिमेत आमचे पूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही देतो.