हिंदु म्हणून आपल्या धर्माचे रक्षण आपण कसे करणार आहोत ?, हे ठरवण्याची वेळ आली आहे ! – नितेश राणे, आमदार, भाजप

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे जनआक्रोश आंदोलन

नितेश राणे, आमदार, भाजप (उजवीकडे)

कोल्हापूर – आपण भाषणे देण्यासाठी येथे जमलेलो नाही. आमदारकी, खासदारकी गेली तरी चालेल. त्याचे काही विशेष मूल्य नाही. मी मरतांना आमदार पद लागणार नाही. मी मरतांना ‘एक हिंदु मेला’, असे ते लोक सांगणार आहेत. त्यामुळे ‘हिंदु म्हणून आपल्या धर्माचे रक्षण आपण कसे करणार आहात ?’, हे ठरवण्याची वेळ आली आहे, असे विधान भाजपचे आमदार श्री. नितेश राणे यांनी येथे केले. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात २ नोव्हेंबर या दिवशी भवानी मंडप येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जनआक्रोश आंदोलना’त ते बोलत होते.

या आंदोलनात भाजप, शिवसेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या जनआक्रोश मोर्चाच्या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकतेचा हुंकार पहायला मिळाला.

नितेश राणे पुढे म्हणाले की,

१. मुसलमानांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे, अशी एक घटना दाखवा. त्यांच्या कोणत्याही व्यक्तीकडे किंवा धर्माकडे वाकड्या दृष्टीने पाहिले, तर ते त्याला जिवंत ठेवत नाहीत. आपल्याला मात्र भगव्या टोप्या घालाव्या लागतात, भगवी उपरणे घालावी लागतात, घोषणा द्याव्या लागतात. आपल्याला कुणीतरी हिंदु नेता लागतो, तरच आपण काही तरी करतो.

२. नगरमध्ये एका हिंदु मुलाने एका मुसलमान तरुणीशी विवाह केला. त्यानंतर तिकडच्या सर्व मुसलमानांनी एकत्र येऊन त्या मुलाला ठेचून काढले; कारण तो मुलगा हिंदु होता. ते लोक धरणे आंदोलन करत बसले नाहीत, टोप्या घालून घोषणा देत बसले नाहीत. घरात माता-भगिनी जर सुरक्षित नसतील, तर आपल्याला ‘जय श्रीराम’ म्हणण्याचा अधिकार आहे का ? हा विचार करण्याची वेळ आली आहे.

३. मी सगळ्या पोलीस विभागाला दोष देत नाही. सगळे पोलीस तसे नसतात; पण काही मोजके जे नालायक आहेत त्यांना शिक्षा मिळणारच आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आज राज्यात हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार आहे. आज राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक नाही, हसन मुश्रीफ मंत्री नाहीत, हे पोलिसांनी यापुढेही लक्षात ठेवावे.