जहांगीरपुरी (देहली) येथील दंगल म्हणजे जिहादी आणि साम्यवादी यांच्या युतीचा राष्ट्रीय सुरक्षेस धोका ! – सत्यशोधन समितीचा अहवाल

देहलीमध्ये वर्ष २०२० मध्ये झालेली दंगल, देशाच्या विविध राज्यांमध्ये यंदाच्या वर्षी हिंदु नववर्षदिन आणि श्रीरामनवमी या दिवशी झालेल्या दंगली अन् हनुमान जयंतीच्या दिवशी जहांगीरपुरीमध्ये झालेली दंगल यांमध्ये मोठ्या प्रमाणात साम्य आढळते. यातील सर्वांत महत्त्वाचे साम्य म्हणजे जिहादी मानसिकता आणि साम्यवादी यांची झालेली युती ! त्यामुळे राष्ट्रवादास या युतीचा असलेला धोका ओळखण्याची आवश्यकता आहे. देहलीस्थित ‘ग्रुप ऑफ इंटेलॅक्चुअल्स अँड ॲकॅडेमिशियन्स’ने एक सत्यशोधन अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. दंगलीनंतर दुसर्‍याच दिवशी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन हा सत्यशोधन अहवाल सिद्ध करण्यात आल्याने त्यामध्ये मांडलेले सत्य हे देशातील समाजासमोर असलेली आव्हाने आणि ‘इकोसिस्टीम’ (धर्मांधांनी विरोधकांना शह देण्यासाठी विविध स्तरांवर राबवण्यासाठी केलेली कार्यप्रणाली) खुली करणारी आहे.

दंगलीमध्ये दगडफेक आणि जाळपोळ करतांना दंगेखोर

१. देहलीत हनुमान जयंतीच्या दिवशी झालेली दंगल

देहलीतील जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते; मात्र अतिशय शांततेत मिरवणूक जात असतांना एका मशिदीजवळच्या घरांमधून दगडफेकीस प्रारंभ झाला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हातात सोडावॉटरच्या बाटल्या, तलवारी, लाठ्या, लोखंडी सळ्या अन् पिस्तुल हाती घेतलेला जमाव आला. या जमावाने पोलिसांची वाढीव कुमक घटनास्थळी येईपर्यंत शोभायात्रेत सहभागी हिंदूंवर आक्रमण करण्यात येत होते. त्यानंतर पोलीस आल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. पुढे पोलिसांनी या प्रकरणी ३० जणांना अटक केली आणि ५ आरोपींवर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्यां’तर्गत (रासुका) गुन्हा नोंदवला आहे.

२. जहांगीरपुरी परिसर म्हणजे अवैध कृत्ये, अतिक्रमण आणि कट्टरतावाद यांचे ठिकाण

सत्यशोधन अहवालामध्ये जहांगीरपुरीमध्ये अतिशय भयानक वातावरण निर्माण झाल्याचे मांडण्यात आले आहे. त्यामध्ये ५ प्रमुख मुद्दे मांडण्यात आले आहेत. ते म्हणजे –

अ. सरकारी जमिनी अवैधरित्या कह्यात घेऊन बांधकामे करणे.

आ. भंगार जमा करण्याच्या बेकायदेशीर जागा.

इ. अवैधरित्या वाहने लावणे (पार्किंग).

ई. अवैध कत्तलखाने.

उ. सट्ट्याच्या (जुगाराच्या) पेढ्या – जहांगीरपुरीमधील डिसी ब्लॉक रस्त्यावर अवैधरित्या वाहने लावण्याची जागा निर्माण करण्यात आली आहे. येथे वाहने लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसै आकारले जातात. विशेष म्हणजे ज्या जागेवर हे पार्किंग सज्ज करण्यात आले आहे, ती जागा सरकारी मालकीची आहे. येथून प्राप्त होणारा पैसा पार्किंग चालवणार्‍यांच्या हाती जातो आणि त्या जोरावर या परिसरात दहशत निर्माण केली जाते.

३. विशिष्ट समुदायाने अवैध व्यवसायांच्या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री करणे आणि शस्त्रे लपवून ठेवणे

याच परिसरामध्ये ‘कबाड इकॉनॉमी’ (भंगार व्यवसायाद्वारे केली जाणारी आर्थिक उलाढाल) उभी राहिली आहे. येथे रहाणारे विशिष्ट समुदायाचे लोक भंगारचा व्यवसाय करतात. येथेही शहराच्या विविध भागातून गोळा करून आणलेले भंगार सरकारी मालकीच्या जागेवर अथवा रस्त्यावर साठवून ढिगारे केले जातात. अशाच ढिगार्‍यांच्या आड सट्ट्याच्या पेढ्या, अमली पदार्थांची विक्री आणि शस्त्रे लपवून ठेवली जात आहेत, असा दावा स्थानिकांकडून करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या ‘कबाड इकॉनॉमी’मध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होऊन पैसा निर्माण होतो. त्या पैशाचा वापर करून पुन्हा सरकारी भूमी कह्यात घेणे आणि अवैध धंदे चालू करण्ो यांसाठी केला जातो. अशा प्रकारे पैसा फिरवून येथे आर्थिक गुन्हेगारीचे एक मजबूत जाळे उभारल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वरील वर्णन केवळ देहलीच नव्हे, तर देशातील अनेक शहरांशी मिळतेजुळते आहे. अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रातीलही जवळपास सर्वच लहान मोठ्या शहरांमध्ये असल्याचे दिसते.

४. आक्रमणाच्या वेळी प्रत्यक्षदर्शीने सांगितलेला चित्तथरारक अनुभव आणि दंगलखोर अन्सार याने केलेले जीवघेणे आक्रमण

दंगलीमध्ये तलवारीद्वारे केलेल्या आक्रमणाने गंभीररित्या घायाळ झालेले विश्व हिंदु परिषदेचे संघटन सचिव उमाशंकर दुबे यांनी वस्तुस्थिती कथन केली आहे. ते म्हणतात, ‘‘शोभायात्रेला वेळेत आणि नियोजित मार्गावरून अतिशय शांततेत प्रारंभ झाला. शोभायात्रा सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास सी-ब्लॉक जामा मशिदीजवळ पोचली. तेव्हा मुसलमान जमावाने लाकडी दांडके, लोखंडी रॉड, तलवारी, पिस्तूल आणि इतर धारदार शस्त्रे घेऊन यात्रेवर आक्रमण केले. मुसलमान महिला आणि मुले यांनी आमच्यावर गच्चीवरून दगड, ॲसिड (आम्ल) अन् पेट्रोल यांच्या बाटल्या फेकल्या. जमावाने शोभायात्रा रथ आणि हनुमानाची मूर्ती यांची तोडफोड केली. स्वत:ला वाचवण्यासाठी मी कुशल चित्रपटगृहाकडे धाव घेतली, जिथे अन्सार जमावाचे नेतृत्व करत असल्याचे दिसून आले. अन्सार आक्रमणकर्त्या जमावास भडकवण्यासाठी ‘किसी को छोडना मत, सबको जान से मारो,’ (कुणाला सोडू नका, त्यांना जीवे मारा) असे ओरडत होता. मी पुढे सरकलो आणि अन्सारला हिंसाचार थांबवायला सांगितला. त्याने ‘ये जो तुमने किया है, उसका अंजाम तो भुगतनाही पडेगा’ (तुम्ही जे काही (शोभायात्रा काढणे) केले आहे, त्याचा परिणाम भोगावाच लागेल), असे उत्तर दिले. त्याच वेळी माझ्यावर पाठीमागून कुणीतरी काठीने आक्रमण केले आणि त्यानंतर लगेचच अन्सारनेच माझ्या मानेवर तलवारीने वार केला. तेथे असलेल्या पोलीस कर्मचार्‍याने मला जमावाच्या तावडीतून बाहेर काढल्यानेच माझा जीव वाचला.’’

५. शोभायात्रेच्या वेळी हिंदू समाज आणि पोलीस यांनी गाफील रहाणे

असा भयावह अनुभव केवळ उमाशंकर दुबेच नव्हे, तर शोभायात्रेत उपस्थित प्रत्येक हिंदूस आला. ‘शोभायात्रेवर अशा प्रकारचे आक्रमण होऊ शकेल’, याची कोणत्याही प्रकारची कल्पना तेथील हिंदू समाजाला नव्हती. त्याचप्रमाणे स्थानिक पोलिसांनीही अशा प्रकारची घटना घडू शकेल, असे वाटले नव्हते; मात्र अशा प्रकारे गाफील रहाणे, हे किती महागात पडू शकते, हेच जहांगीरपुरीच्या घटनेतून स्पष्ट झाले. जहांगीरपुरीच्या घटनेने हिंदू समाजाला एक महत्त्वाचा धडा मिळाला आहे. तो म्हणजे आपल्या परिसरात आणि घराशेजारी नेमके काय चालू आहे ? याकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे.

६. मदरसे कि कट्टरतावादाचे केंद्रस्थान ?

जहांगीरपुरी भागात गेल्या काही वर्षांमध्ये मदरशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे सत्यशोधन अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. ‘धार्मिक शिक्षण दिले जाणार्‍या मदरशांमधूनच कट्टरतावादाचेही शिक्षण दिले जात आहे का ?’, असा प्रश्न अहवालामध्ये उपस्थित करण्यात आला आहे.

Þ लेखक – पार्थ कपोले (साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)

बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान महिला अन् लहान मुले यांचा वापर करण्याचा ‘पॅटर्न’ (पद्धती) ! – अधिवक्ता मोनिका अरोरा, सर्वोच्च न्यायालय

यापूर्वी देहलीमध्येच शाहीनबागेत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. तेथेही महिला आणि लहान मुलांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळे महिला आणि लहान मुले यांचा वापर करून आता अराजकता पसरवण्याचा नवा ‘पॅटर्न’ सिद्ध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे जहांगीरपुरी भागात अवैधरित्या वास्तव्य करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान शाहीनबागेतही बसले होते अन् आता येथील दंगलीतही त्यांचा सहभाग असल्याचे चित्र आहे. सर्वांत धक्कादायक म्हणजे अवघ्या १४ – १५ वर्षांच्या मुलामुलींवर कट्टरतावादाचा पगडा निर्माण झाला आहे. जहांगीरपुरी परिसरात तेथील मुलींशी संवाद साधला असता त्यांनी अगदी सहजपणे म्हटले, ‘अब तो हमारा रमजान का पवित्र महिना चल रहा है । तो वो लोग (हिंदू) हनुमान जयंती कैसै मना सकते है ?’ (आता आमचा रमजान मास चालू आहे. असे असतांना ते लोक (हिंदु) हनुमान जयंती साजरी कसे करू शकतात ?) त्यामुळे या कट्टरतावादाच्या विरोधात लढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

  • लेखक – पार्थ कपोले

सत्यशोधन समितीने केलेल्या शिफारशी

अ. परिसरात अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना हद्दपार करावे.

आ. परिसरातील अवैध व्यवसाय आणि बांधकामे यांविरोधात कारवाई करणे.

इ. परिसरात कट्टरतावादाच्या विरोधात विशेष कार्यक्रम राबवण्यात यावा.

ई. दंगल पूर्वनियोजित असल्याचे आढळून आल्याने स्थानिक मुसलमानांचा सहभाग नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर आणि ‘जमात-ए-इस्लामी’ संघटनेवर कारवाई करावी.

उ. बांगलादेशी आणि रोहिंग्या यांनी अवैधपणे नागरिकत्व मिळवल्याविषयी अन्वेषण व्हावे.

ऊ. परिसरातील अवैध गोष्टींकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष.

ए. अचानकपणे दगड आणि सोडावॉटरच्या बाटल्या जमा होण्याची चौकशी व्हावी.

ऐ. सरकारी मालकीच्या भूमीवरील धार्मिक बांधकामे तातडीने काढावीत.

ओ. हिंदूंमध्ये भयाचे वातावरण असल्याने तक्रार करण्यास ते घाबरत आहेत. त्याविषयी योग्य ती कार्यवाही करावी.

संपादकीय भूमिका 

देशात अस्थिरता माजवून राष्ट्रीय सुरक्षिततेस धोका पोचवणार्‍यांना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !