साधकांना साधनेत साहाय्य करणार्‍या सनातनच्या ११८ व्या समष्टी संत पू. रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ११८ व्या संत पू. रत्नमाला दळवी यांच्याविषयी साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

पू. रत्नमाला दळवी

१. सौ. अंजली अजय जोशी, सनातन आश्रम, मिरज 

१ अ. ‘प्रत्येक साधकाची साधना आणि सेवा व्हावी’, याकडे लक्ष असणे

सौ. अंजली जोशी

‘पू. रत्नमालाताई सर्व साधकांवर मातृवत् प्रेम करतात. त्या ‘साधकांना सेवेत काय अडचणी आहेत ? त्यांना काही त्रास आहे का ? साधकांमध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे कोणते पैलू आहेत ?’, हे सर्व जाणून घेऊन त्या साधकांना हाताळतात. ‘प्रत्येकाची साधना आणि सेवा कशी होईल ?’, याकडे त्यांचे सतत लक्ष असते.

१ आ. साधकांना साधनेत साहाय्य करणे

१. ‘प्रत्येक साधकाला गुरुचरणांची प्राप्ती व्हावी’, यासाठी पू. ताई साधकांना ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या मुळाशी जाऊन कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी उत्तम मार्गदर्शन करतात.

२. पू. ताई प्रत्येक साधकाने केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतात.

३. पू. ताई ‘साधक कुठे न्यून पडतात ?’, याचे निरीक्षण करतात आणि ‘त्यावर कशा पद्धतीने मात करायला हवी ?’, याविषयी सांगतात. त्यामुळे आम्हाला व्यष्टी साधनेच्या आढाव्यातून आनंद मिळतो. आम्ही आढाव्याच्या दिवसाची वाट पहात असतो.

१ इ. ‘साधकांना स्वभावदोष-निर्मूलनासाठी साहाय्य व्हावे’, यासाठी त्यांना योग्य ती सेवा देणे

साधकातील एखादा स्वभावदोष समष्टी सेवेत घातक ठरत असल्यास त्यावर मात करण्यासाठी पू. ताई त्या साधकाला योग्य ती सेवा देतात. त्यामुळे आपोआपच त्या साधकाचे स्वभावदोष हळूहळू न्यून होऊ लागतात. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

१. पूर्वी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात एकच साधक प्रार्थना किंवा भावप्रयोग सांगायचा; मात्र ‘सर्वांना भावप्रयोग सांगता यायला हवा. साधकांचा आत्मविश्वास वाढायला हवा’, यासाठी पू. ताईंनी प्रत्येक साधकाला संधी दिली. पू. ताईंनी ‘प्रत्येक आठवड्याला एका साधकाने प्रार्थना सांगायची आणि एका साधकाने भावप्रयोग घ्यायचा’, असे ठरवून दिले आहे.

२. माझ्यात ‘संगणकीय सेवा मला जमणार नाही’, असा न्यूनगंड होता. पू. ताईंनी मला एक सेवा दिली आणि ती सेवा माझ्याकडून करवून घेतली. त्यामुळे आता मला ती सेवा आत्मविश्वासाने करता येते.

१ ई. तत्त्वनिष्ठ

पू. ताई तत्त्वनिष्ठ राहून साधकांना त्यांच्या सेवेतील चुका सांगतात.

१ उ. पू. ताईंनी सांगितलेली उपाययोजना केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होऊन नामजप करता येणे

एकदा मला एका प्रसंगाचा पुष्कळ ताण आला होता. माझ्या मनात संघर्ष चालू झाल्याने माझे नामजपात लक्ष लागत नव्हते. मी पू. ताईंना याविषयी सांगितले. त्यांनी मला हा प्रसंग लिहून संबंधितांकडे पाठवायला सांगितला. त्यांनी मला ‘भगवंत त्या प्रसंगातील साधकाची काळजी घेणार आहे’, अशा आशयाची स्वयंसूचना द्यायला सांगितली. त्यामुळे माझ्या मनातून नकारात्मक विचार निघून गेले आणि मला शांतपणे नामजप करता आला.’

२. श्री. विपीन देशपांडे, सनातन आश्रम, मिरज

२ अ. व्यवस्थितपणा

श्री. विपीन देशपांडे

‘पू. रत्नमालाताईंची प्रत्येक वस्तू व्यवस्थित ठेवलेली असते. त्यांच्या पटलावरील सर्व साहित्य आवरलेले आणि स्वच्छ असते. त्या सहसाधकांनाही साहित्य व्यवस्थित ठेवण्याविषयी आठवण करून देतात.

२ आ. तत्त्वनिष्ठता

पू. ताई आमच्याकडून झालेली चूक लगेच सांगतात आणि तिच्या मुळाशी जाऊन उपाययोजना सांगतात. आमच्याकडून पुनःपुन्हा चूक होत असल्यास त्या आम्हाला त्याची कडकपणे जाणीव करून देतात; पण त्यांच्या वागण्यात त्याविषयी नंतर कुठेही प्रतिक्रिया नसते. त्या साधकांशी सहजतेने बोलतात आणि वागतात.

२ इ. पू. ताई व्यष्टी साधनेच्या आढाव्यात अल्प शब्दांत अचूक मार्गदर्शन करतात. त्यामुळे मनात काही शंका रहात नाही.

२ ई. पू. ताई साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देतांना त्यांच्या वाणीत क्षात्रतेज जाणवते; मात्र त्या दुसरे सूत्र सांगत असतांना ‘त्यांच्या वाणीतून वात्सल्यभाव आणि प्रीती यांच्या स्पंदनांचा ओघ पुष्कळ प्रमाणात येत आहे’, असे जाणवते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.३.२०२२)

सर्वगुणसंपन्न हिरकणी ।

रत्नागिरीचे रत्न जडले ।
गुरुमाऊलीच्या (टीप) मुकूट कोंदणी ।
भगवंताने दिला आम्हासी ।
साजेसा एक चिंतामणी ।। १ ।।

अखंड एकरूप असे सेवेसी ।
स्थान मिळविले साधकांच्या मनी ।
रत्नपारख्याने ओळखली ।
सर्वगुणसंपन्न हिरकणी ।। २ ।।

घेता येऊ दे तिचा लाभ आम्हासी ।
गुणसुमने अर्पूया गुरुचरणी ।
भगवान श्रीकृष्ण, श्री गुरुमाऊली अन् पू. रत्नमालाताई यांच्या चरणी ।
ही शब्दसुमने समर्पित ।। ३ ।।

टीप – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या

– सौ. अंजली अजय जोशी, सनातन आश्रम, मिरज. (१६.३.२०२२)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक