उमेश कोल्हे हत्या प्रकरणात विदेशी शक्ती आहे का ? याची चौकशी होणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

मुंबई, ४ जुलै (वार्ता.) – अमरावती येथील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांची हत्या ही गंभीर घटना आहे. ज्या कारणाने त्यांना मारण्यात आले, ते अतिशय निंदनीय आहे. या घटनेतील आरोपी आणि मुख्य सूत्रधार पकडले गेले असले, तरीही यामागे काही विदेशी शक्ती आहे का ? याची चौकशी करण्यात येईल. प्रारंभी या प्रकरणाला दरोड्याचे कारण देण्यात आले होते. तशा प्रकारची वृत्ते पसरवली गेली; परंतु अजूनही पूर्ण चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जुलै या दिवशी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना केले. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट पशूवैद्य असणाऱ्या शेख इरफान शेख रहीम यानेच रचला होता. या गटात सामील असणारा डॉ. युसुफ खान हा उमेश कोल्हे यांच्या अंत्ययात्रेतही सहभागी झाला होता, अशी माहिती पोलीस अन्वेषणातून समोर आली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करण्यापर्यंत जाणारी धर्मांधांची मजल मोडून काढण्यासाठी नवे सरकार पावले उचलेल, ही अपेक्षा !