अधिकोषांनी (बँकांनी) खरीप हंगामातील कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी

मध्यभागी शेखर सिंह

सातारा, २७ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील सर्व अधिकोषांना शाखांनुसार खरीप हंगामात पात्र शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट अधिकोषांनी पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सर्व अधिकोष अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ते बोलत होते. जिल्हाधिकारी सिंह पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्ज काढण्यात काही अडचणी येत असतील, तर त्यांनी कृषी विभागाकडून माहिती घ्यावी. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणासाठी योग्य मार्गदर्शन करावे. लघुउद्योजकांसाठी कर्जाची मागणी मोठी नसते. त्यामुळे लघुउद्योजकांसाठी अधिकाधिक कर्ज प्रकरणे संमत करावीत. तसेच अधिकाधिक बचत गटांची कर्ज प्रकरणे संमत करण्यात यावीत.