शहापूर (जिल्हा बेळगाव) स्मशानभूमीतील चौथऱ्यावरील पत्रे धोकादायक स्थितीत !

बेळगाव – मागील काही मासांपासून उपनगर परिसरातील शहापूर स्मशानभूमीतील अंत्यविधी चौथऱ्यावरील पत्रे खराब झाले असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात काही मासांपूर्वी आमदार अभय पाटील यांनी महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना शहापूर स्मशानभूमीच्या समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या होत्या, तसेच अधिकाऱ्यांनी पत्रे पालटण्याचे आश्वासनही दिले होते; मात्र प्रत्यक्षात अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. (जे सर्वसामान्यांना कळते, ते अधिकाऱ्यांना का कळत नाही ? कि ते जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करतात. संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)
यापूर्वीही कोरोना संसर्गाच्या काळात पत्रे खराब झाले असतांना स्मशानभूमी सुधारण्याच्या कामात कार्यरत असलेल्या ‘मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळा’च्या वतीने बेळगाव महापालिकेला माहिती देण्यात आली होती. त्या वेळीही महापालिकेने नवे पत्रे घालण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्या वेळी खराब झालेले ४० पत्रे हैबत्ती कुटुंबियांच्या साहाय्याने अंत्यविधी चौथऱ्यावर घालण्यात आले होते. त्यामुळे या वेळी तरी प्रशासनाकडून स्मशानभूमीतील खराब झालेले पत्रे काढून तात्काळ नवे पत्रे बसवण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. (अशी मागणी नागरिकांना का करावी लागते, प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष !