देशातील महिला अत्याचारांत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक !

  • महिलांच्या तक्रारींत ४२.३३ टक्के वाढ !

  • ३ वर्षांत महाराष्ट्र ७व्या क्रमांकावरून ३र्‍या क्रमांकावर पोचला !

जळगाव – देशात वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांमध्ये स्वत:चे कुटुंबीय आणि नातलग यांच्याकडून घरगुती हिंसा अन् छळासह क्रूरतेची वागणूक देऊन सन्मानाने जगण्याचा अधिकार नाकारल्याविषयी महिलांच्या तक्रारींत ४२.३३ टक्के वाढ झाली.

यात महिलांनी महिला आयोगाकडे २३ सहस्र ४९७ तक्रारी केल्या आहेत. यात उत्तरप्रदेश पहिल्या, देहली दुसर्‍या, तर महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर आहे. ३ वर्षांत महाराष्ट्र ७व्या क्रमांकावरून ३र्‍या क्रमांकावर पोचला आहे.

देशातील महिलांचा सन्मानाने जगण्याचा हक्क त्यांचे कुटुंबीय आणि नातलग यांच्याकडून नाकारला जात आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडून ‘सन्मानाने जगण्याचा अधिकार’ या शीर्षकांतर्गत या तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. त्यामध्ये घरगुती हिंसा, क्रूरता आणि छळ या ३ प्रकारांच्या तक्रारींचा एकत्रित समावेश करण्यात आला आहे. वर्ष २०१९ च्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये दळणवळण बंदीत महिलांच्या घरगुती हिंसा, छळ आणि कुटुंबियांकडून मिळणार्‍या क्रूर वागणुकीविषयीच्या तक्रारींत ६०.८४ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०१९ मध्ये महाराष्ट्रातील महिलांनी १२७ तक्रारी प्रविष्ट केल्या. या तक्रारींमध्ये देशात मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्र ७व्या क्रमांकावर होता.

संपादकीय भूमिका

  • आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्याचा परिणाम ! अशा घटना रोखण्यासाठी कुटुंबात धर्माचरण आणि साधना करणेही आवश्यक आहे !
  • महिलांच्या अत्याचारविरोधी कायद्यांची प्रभावीपणे कार्यवाही न केल्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटतात ! हे चित्र आजपर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !