उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नगर आणि नाशिक येथे सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला लाभलेला उदंड प्रतिसाद !

धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ज्ञानशक्ती प्रसार अभियानाविषयी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

१. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी ‘साधकांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यासाठी आपत्काळातही त्यांना सेवेची संधी देऊन आनंद देण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली सुवर्णसंधी म्हणजे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान !’

सद्गुरु नंदकुमार जाधव

१ अ. सनातन संस्थेच्या ज्ञानशक्ती प्रसार अभियानाला सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळणे : सनातन संस्थेच्या वतीने वर्ष २०२१ च्या नवरात्रीपासून ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ चालू झाले. या अभियानांतर्गत साधक शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ग्रंथालये इत्यादी ठिकाणी ग्रंथ वितरणाची सेवा करत आहेत. ‘श्री सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधकांना ज्ञानशक्ती प्रसार अभियानाची सेवा करण्याची संधी मिळत असून त्यांच्या कृपेने सर्वत्र उदंड आणि त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे प्रतिसाद मिळत आहे. कुठेही गेल्यावर साधकांना सकारात्मक प्रतिसाद आणि ग्रंथांना प्रचंड मागणी मिळत आहे.

‘श्री सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्याला सेवा दिली, म्हणजे त्यांचा संकल्प कार्यरत झाला.’ – सद्गुरु जाधवकाका

१ आ. ‘इतक्या वेगवेगळ्या विषयांवर एवढे ग्रंथ लिहिणारी व्यक्ती मोठी विभूती असली पाहिजे’, असे समाजातील लोकांनी म्हणणे : त्यामुळे आपल्याला अनुभूती येऊ लागल्या. संपर्क केल्यावर लोक म्हणायचे, ‘इतक्या वेगवेगळ्या विषयांवर एवढे ग्रंथ प्रथमच पहात आहोत. हे इतके ग्रंथ लिहिणारी व्यक्ती निश्चितच कोणीतरी असामान्य विभूती असणार.’ समाजातील लोकांना ठाऊक नाही. ती असामान्य विभूती श्रीविष्णूचा अवतार श्री जयंत अवतार आहेत. ते या ज्ञानशक्ती प्रसार अभियानातून लोकांना जणू त्याची जाणीव करून देत आहेत.

१ इ. धर्माची विस्कटलेली घडी बसवणे, हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवून त्यांना अभय देणे अन् साधकांना आनंद देणे, यांसाठी गुरुदेवांनी दिलेली ही सुवर्णसंधी असणे : ज्ञानशक्ती प्रसार अभियान म्हणजे धर्माची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी, हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी, आपत्काळातही साधकांना सेवेची संधी देऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी, हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवून त्यांना अभय देण्यासाठी आणि साधकांना आनंद देण्यासाठी गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) दिलेली ही सेवेची सुवर्णसंधी आहे. आता समाजातील सनातन संस्थेविषयीची नकारात्मकता न्यून झाली असून सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सर्व साधकांमध्येही सकारात्मकता हा गुण वाढू लागला आहे. ही सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आहे.

१ ई. ग्रंथांमधील चैतन्यामुळे ग्रंथ पहातांनाच लोकांच्या तोंडवळ्यावर आनंद फुललेला दिसणे : गुरुदेवांच्या या कृपेमुळे साधकांचा उत्साहही वाढला आहे. ग्रंथांची प्रचंड मागणी मिळत आहे. जिथे आपली ओळख नाही, तेथेही परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला घेऊन जात आहेत आणि त्यांच्या संकल्पामुळे नवीन ठिकाणीही ग्रंथांची मागणी मिळत आहे. त्यामुळे ‘ग्रंथ घेण्यासाठी लोक जणू साधक येण्याची वाट पहात आहेत’, असे वाटते. ग्रंथ पाहूनच लोक भारावून जात आहेत. ते ग्रंथांची मुखपृष्ठे पाहून प्रभावित होत आहेत. ग्रंथांमधील चैतन्यामुळे ग्रंथ पाहिल्यावर लगेचच त्यांच्या तोंडवळ्यावर आनंद फुललेला दिसून येत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे द्रष्टेपण

ग्रंथांना भरभरून मिळत असलेला प्रतिसाद पाहून ‘पुढे आपल्या ग्रंथांचे वितरण मोठ्या प्रमाणात होणार आहे’, या परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या वाक्याची प्रचीती येणे

‘ग्रंथ पाहिल्यावर लोक आनंदी होऊन म्हणत आहेत, ‘‘कोणते आणि किती ग्रंथ घ्यावेत ?’’, असा प्रश्न पडतो. असे म्हणून ते ‘सर्वच घेतो’, असे म्हणत सर्व ग्रंथ ठेवून घेत आहेत. काही वर्षांपूर्वी ग्रंथप्रदर्शन लावल्यावर लोक ग्रंथ पहायचे; पण किंमत पाहिल्यावर काही जण साधकांना सांगायचे, ‘‘तुमच्या ग्रंथांची किंमत पुष्कळ अधिक आहे. गरिबांपर्यंत हे ग्रंथ जाण्यासाठी यांच्या किंमती अल्प ठेवा. गोरखपूरच्या गीता प्रेसच्या ग्रंथांच्या किंमती किती अल्प आहेत, ते बघा. सर्वसामान्य लोकही ते घेऊ शकतात.’’ त्या वेळी लोक ग्रंथ न घेताच निघून जायचे. हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर ते एकदा म्हणाले होते, ‘‘आता आपण ग्रंथांची माहिती कशी सांगायची ? त्यांच्या वितरणाचा हिशोब कसा ठेवायचा ?’, हे शिकूया. पुढे आपल्या ग्रंथांचे वितरण मोठ्या प्रमाणात होणार आहे. तेव्हा ग्रंथाचा हिशोब आपल्याला ठेवता आला पाहिजे.’’ परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) या वाक्याची मला आठवण झाली. त्यावरून त्यांचे द्रष्टेपणही लक्षात आले. त्यांनी म्हटल्याप्रमाणे ग्रंथांचे वितरण प्रचंड प्रमाणात होत आहे. आपणच ग्रंथ पुरवठा करायला न्यून पडत आहोत. सतत ग्रंथांची छपाई करावी लागत आहे. आता कुणीही ‘ग्रंथांच्या किंमती अधिक आहेत’, असे म्हणत नाहीत.

– सद्गुरु नंदकुमार जाधव (२९.१.२०२२)

२. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी व्यक्त केलेली भावपूर्ण कृतज्ञता !

२ अ. वर्णू किती उपकार ? गुरुमाऊली, तुझे वर्णू किती उपकार ! : ज्ञानशक्ती अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून ‘सनातनचे कार्य होणे आवश्यक आहे’, असे आता समाजातील लोकच म्हणू लागले आहेत. लोकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहिलेले नाही, तरी लोकांना त्यांच्याविषयी आदर वाटत आहे. त्यांच्यामध्ये त्यांना भेटण्याची ओढ आणि तळमळ वाढत आहे. जिज्ञासू, धर्मप्रेमी, उद्योगपती आणि आधुनिक वैद्य हेही या कार्यात सहभागी होत आहेत. त्यांच्यावरही गुरुदेव कृपा करत आहेत. ‘ग्रंथांची मागणी जिथे मिळणार असेल, तिथे गुरुदेवच साधकांना घेऊन जात आहेत’, अशा अनुभूती साधकांना येत आहेत. ते साधकांकडून सेवा आणि साधना करवून घेऊन त्यांना आनंदाची अनुभूतीही देत आहेत.

२ आ. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केलेली भावपूर्ण प्रार्थना ! : साधकांना या अभियानात सेवेची संधी देऊन गुरुदेव साधकांवर कृपेचा वर्षाव करत आहेत. त्यांनी साधकांना दिलेली ही सेवेची संधी म्हणजे त्यांचे साधकांवरील उपकारच आहेत. त्यांच्या या अनंत उपकारांचे वर्णन कसे करणार ? या अभियानात आपल्याकडून चुका झाल्या आणि अपराध घडले, तरी ते त्यांनी पोटात घेतले. त्यांनी पुनःपुन्हा साधकांना सेवेची संधी दिली. हे अभियान आणि आजपर्यंत त्यांनी जे शिकवले, ते त्यांचेच अनंत उपकार आहेत. त्यांची ही साधकांवरील प्रीतीच आहे. त्यांनी आपल्यासाठी पुष्कळ काही केले आहे; मात्र आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. आपण केवळ त्यांचे स्मरण करावे आणि त्या स्मरणामध्ये भावाश्रूंनी चिंब व्हावे. त्यांना त्या भावाश्रूंनी त्यांच्या चरणांवर अखंड अभिषेक करता यावा. ‘गुरुदेवांनी साधकांना ही संधी द्यावी’, अशी मी त्यांच्या चरणी अगदी शरणागत होऊन प्रार्थना करत आहे.

किती वर्णू, गुरूंचा महिमा अपार ।
    दिली त्यांनी संधी ज्ञानशक्ती सेवेची ।
    वर्णू किती उपकार, गुरूंचे वर्णू किती उपकार । 
    श्री जयंत अवताररूपी कार्याचा संकल्प महान ।।’

– सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था. (२९.१.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.