राज्यात वाहनांच्या वायूप्रदूषण चाचणीच्या दरांत वाढ !

परिवहन विभागाचा निर्णय !

मुंबई – वाहनांची वायूप्रदूषण पडताळणी करून वायूप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पोल्युशन टेस्ट सर्टिफिकेट (पीयूसी)) मिळवणे आता महाग होणार आहे. या चाचणीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे परिवहन विभागाने सांगितले. दुचाकीच्या चाचणीच्या दरात १५ रुपये, तर चारचाकीच्या दरात ३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तात्काळ लागू आहे.

वाहनांमधून उत्सर्जित होणाऱ्या धुरामधून विषारी वायू बाहेर पडत असल्याने वायूप्रदूषणात भर पडते. वायूच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने वाहनांची प्रदूषण नियंत्रण चाचणी करणे बंधनकारक केले आहे. नवीन वाहन खरेदी केल्यानंतर पीयूसीची मुदत एक वर्षापर्यंत असते. त्यानंतर प्रत्येकी ६ मासांनी हे प्रमाणपत्र काढणे बंधनकारक असते. सध्या दुचाकी वाहन तपासणी किंवा चाचणी यांच्यासाठी ३५ रुपये दर असून त्यात वाढ केल्याने हा दर ५० रुपये इतका झाला आहे. पेट्रोलवरील तीनचाकी वाहनाचा दर ७० रुपयांवरून १०० रुपये, तर पेट्रोल, सी.एन्.जी., एल्.पी.जी. यांवर चालणाऱ्या चारचाकींसाठी ९० रुपयांवरून १२५ रुपये आणि डिझेलवरील वाहनांसाठी हा दर ११० रुपयांवरून १५० रुपये करण्यात आला आहे.