भोंगे उतरवण्याच्या न्यायालयाच्या कायद्याची आधी कार्यवाही करा !

गृहमंत्र्यांच्या चेतावणीवर मनसेचे उत्तर !

हिंदूबहुल देशात हिंदूंना ध्वनीक्षेपकावर ‘हनुमान चालिसा’ लावण्याची बंदी आणि मशिदींवरील भोंगे अनेक वर्षे चालू आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ? – संपादक 

डावीकडून दिलीप वळसे पाटील आणि राज ठाकरे

मुंबई – गृहमंत्र्यांनी कायदा कसा राबवायचा हे शिकले पाहिजे. न्यायालयाने (मशिदीवरील) भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिले आहेत, त्याचे पालन करा मग आम्हाला धमक्या द्या, असे सडेतोड प्रत्युत्तर मनसेचे संदीप देशपांडे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘समाजात तेढ निर्माण करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल’, असे मनसेला उद्देशून म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील वक्तव्य केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानात ‘मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही त्यासमोर दुप्पट आवाजात ध्वनीक्षेपकावर ‘हनुमान चालिसा’ लावण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर घाटकोपरमध्ये मनसेचे पदाधिकारी महेंद्र भानूशाली यांनी हनुमान चालीसासाठी लावलेले भोंगे उतरवण्यात आले होते.

‘अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. असे धमकी देणारे पुष्कळ गृहमंत्री आम्ही बघितले आहेत. मूळात विषय असा आहे की, आम्ही सांगतोय कायद्याचे पालन करा. ते गृहमंत्र्यांनी प्रथम करावे आणि मग आम्हाला दम द्यावा’, असेही देशपांडे या वेळी म्हणाले.

जातीयवादी वक्तव्य करून हिंदूंमध्ये फूट पाडणारे सुजात आंबेडकर !

राज ठाकरे यांच्यावरील वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकर यांचा नुकताच विदेशात शिकून आलेला मुलगा सुजात आंबेडकर यांनी समाजामध्ये येऊन ३ एप्रिल या दिवशी प्रथमच पुढील वक्तव्य केले ‘राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना जानवे हनुमान चालिसा म्हणायला बसवा; मात्र तिथे एकही बहुजन पोरगा असता कामा नये.’

भाजपचे मोहित कंबोज यांनी ज्यांना मंदिरात भजने किंवा अन्य काही स्तोत्रेल श्लोक आदी लावायचे असेल, त्यांना भोंगे विनामूल्य देण्यात येतील, असे घोषित केले आहे.