हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात न्यायालयीन लढा देण्यासाठी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ‘हिंदु टास्क फोर्स’ची स्थापना !

धर्माविषयी आस्था आणि तळमळ असलेल्या युवकांचे ‘फोर्स’च्या माध्यमातून संघटन केले जाईल ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल

अधिवक्ता खुश खंडेलवाल

भाईंदर (जिल्हा ठाणे), १६ ऑक्टोबर (वार्ता.) – धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या, तसेच हिंदूंच्या देवतांची विटंबना आदी हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात संघटितपणे न्यायालयीन लढा देण्यासाठी ‘हिंदु टास्क फोर्स’ची (Hindu Task Force) स्थापना करण्यात आली आहे. ‘धर्माविषयी आस्था आणि तळमळ असलेल्या युवकांचे या ‘फोर्स’च्या माध्यमातून संघटन केले जाईल’, अशी घोषणा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच १५ ऑक्टोबर या दिवशी केली. अधिवक्ता खुश खंडेलवाल यांच्या भाईंदर येथील कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

‘हिंदु टास्क फोर्स’ या संघटनेच्या स्थापनेविषयी अधिवक्ता खंडेलवाल म्हणाले, ‘‘हिंदु टास्क फोर्स’च्या कार्याच्या अंतर्गत धर्मावरील आघातांच्या विरोधात न्यायालयीन लढा देण्यासाठी ‘विनामूल्य कायदा प्रशिक्षण कार्यशाळे’चे आम्ही लवकरच आयोजन करणार आहोत. यासाठी भाईंदर आणि मीरारोड येथील युवकांना प्राधान्य दिले जाईल.’’ ‘हिंदु टास्क फोर्स’ या संघटनेच्या स्थापनेच्या कार्यक्रमाच्या वेळी सर्वश्री नरेश निले, विपुल कामदार, रवी मिश्रा, सोनू जयस्वाल, प्रदीप दुबे, वीरेंद्र दुबे, मोहित गुप्ता, वैभव राशीनकर, प्रदीप यादव, रवींद्र यादव आदी धर्मप्रेमी युवक उपस्थित होते.