राज्याच्या राजकारणात जातीचे सूत्र राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मोठे झाले ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीचे सूत्र मोठे झाले, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मागील काही वर्षांत जातीच्या आधारे राजकारणात वाढ झाली आहे. त्याविषयी बोलतांना राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जातीचे सूत्र त्या त्या जातीतील नेत्यांना मोठे करण्यासाठी पुढे केले जाते. महाराष्ट्रात दुसर्‍या जातीविषयीचा द्वेष वाढत आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहर्‍याला हे डाग लावणारे आहे. महाराष्ट्र जातीपातीत गुंतत चालला आहे. सर्वांनाच जातीचा अभिमान असतो आणि असलाही पाहिजे; पण त्यापेक्षा जास्त दुसर्‍याच्या जातीचा द्वेष लोकांच्या मनात निर्माण झाला आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.