तपोधाम (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ९४ व्या संत पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये (वय ७० वर्षे) यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये

१. ‘पू. शेट्येकाकूंचे बोलणे एकदम गोड असल्याने सर्व लहान-थोर साधक त्यांच्याकडे आकर्षित होतात.

२. पू. काकू कधीही भाजी, उरलेले शिळे अन्न इत्यादी फुकट घालवत नाहीत. महाप्रसादाच्या वेळी सर्व साधकांना त्या त्याचे वाटप करतात.

३. विचार आणि मन यांचे व्यापकत्व

पू. काकूंच्या विचारांमध्ये व्यापकता दिसून येते. एखादा साधक किंवा साधिका यांच्याविषयी मी प्रतिक्रिया व्यक्त केली, तर त्या केवळ ऐकून घेतात आणि त्या साधकाच्या स्वभावदोषांच्या संदर्भात चर्चा न करता ‘साधनेच्या दृष्टीकोनातून त्याकडे कसे पहायचे ?’, हे त्या मला सांगतात.

श्री. मेघशाम आंबेकर

४. सतत इतरांचा विचार करणे

पू. काकू सतत ‘दुसर्‍याला काय आवडेल ? कशा प्रकारे कृती केली असता दुसर्‍यांना त्रास होणार नाही’, हा विचार करून कृती करतात. स्वतः जेवत असतांना किंवा सेवा करत असतांना ‘सहसाधकांना काय हवे आहे ?’, हे समजून घेऊन ती कृती करण्यास त्या प्राधान्य देतात. ‘मी आता सेवेत आहे’, असे उत्तर त्यांनी कधीही दिले नाही. प्रत्येक साधकाची आवड-नावड आणि वैयक्तिक पथ्य यांचे भान ठेवून त्या अल्पाहार अन् महाप्रसाद बनवतात.

५. आंतरिक साधना उच्च प्रतीची असणे

पू. काकू सेवा करतांना त्यात एकरूप होत असल्याने त्यांचे नामजप, उपाय इत्यादी व्यष्टी साधनेकडे लक्ष नसते. ‘त्यांचा तोंडवळा शांत असणे, निर्भयतेने वावरणे, सतत हसतमुख असणे, ताण नसणे’, या गुणांकडे पाहिल्यावर त्यांची आंतरिक साधना उच्च प्रतीची असल्याचे माझ्या लक्षात आले.

६. आलेल्या अनुभूती

६ अ. पू. काकूंनी साधनेचे महत्त्व सांगितल्यावर एका व्यक्तीने नामजपाला आरंभ करणे : पू. काकू कधीही कुणाला साधनेविषयी आपणहून सांगत नाहीत. १८.५.२०१९ या दिवशी (काकू संत होण्यापूर्वी २ दिवस) लवेल येथील औषधाचे दुकानदार काही कामानिमित्त तपोधाम येथे आले होते. अकस्मात् आपत्काळावरून विषय निघाल्यानंतर काकूंनी त्यांना २० ते २५ मिनिटे आपत्काळातील साधनेचे महत्त्व, व्यष्टी साधना, नामजप आणि स्वभावदोष-निर्मूलन यांविषयी सुंदर माहिती दिली. ती ऐकून त्या व्यक्तीने नामजपाला आरंभ केला.

६ आ. उन्हाळ्यात बोअरिंगला अधिक वेळ पाणी येणे : एप्रिल आणि मे या दोन मासांत तपोधाम येथील बोअरिंगला केवळ २० ते २५ मिनिटे पाणी येते; परंतु काकू संत झाल्यानंतर दोन वेळा बोअरिंगला दीड घंट्यापर्यंत पाणी आले.’

– श्री. मेघशाम आंबेकर, तपोधाम, रत्नागिरी (१९.५.२०१९)