हिंदु राष्ट्र होणे आवश्यक ! – महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री महंत नरसिंह दास महाराज

हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

हरिद्वार – हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था जे प्रयत्न करत आहेत, ते प्रशंसनीय आहे. हिंदु राष्ट्र होणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी मी सर्व संतांच्या बैठकीचे आयोजन करणार आहे, असे मार्गदर्शन मध्यप्रदेशमधील मांडवगढ धाराचे चतुर्भूज श्रीराममंदिर महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री महंत नरसिंह दास महाराज यांनी केले.

येथे झालेल्या कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवण्यात आले. या अंतर्गत विविध आखाड्याचे संत, महंत आणि महामंडलेश्वर यांची समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांसह समितीचे सर्वश्री हरिकृष्ण शर्मा, राजेश उमराणी, प्रवीण वाघमारे आणि धर्मप्रेमी श्री. संजीव पुंडिर आदींनी भेट घेतली. या वेळी हिंदु राष्ट्राची स्थापना, राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, विविध माध्यमांद्वारे होणारे देवतांचे विडंबन, लव्ह जिहाद अन् आतंकवाद, हिंदूसंघटन आदी अनेक विषयांवर समिती करत असलेल्या कार्याविषयी माहिती देऊन आशीर्वाद घेण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याने होत आहे समाज परिवर्तन ! श्री श्री १००८ महंत श्री हरिदास महाराज

हे राष्ट्र हिंदु राष्ट्र नक्की बनणार आहे. यासाठी आम्हीही आमच्या क्षेत्रात प्रचार करत आहोत. तुम्ही करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. सर्व साधूसंतांनीही हे कार्य करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही सर्व साधूसंतांना एकत्रित करून समाजामध्ये धर्मजागृतीचे कार्य जे कार्य करत आहात, त्यामुळे समाजात पालट होत आहे, असे गौरवोद्गार रनिया रामपूरगड, ढाणी (राजस्थान) येथील श्री श्री १००८ महंत श्री हरिदास महाराज यांनी येथे काढले.

तुम्ही चांगले कार्य करत आहात ! – महंत श्री पुरुषोत्तम दास महाराज, विदिशा, मध्यप्रदेश

‘जे समाजाला आवश्यक आहे, ते चांगले कार्य तुम्ही करत आहात. आमचे तुमच्या कर्याला आशीर्वाद आहेत’, असे गौरवोद्गार महंत श्री पुरुषोत्तम दास महाराज यांनी केेले.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची समाजाला आवश्यकता ! – महामंडलेश्वर सावरिया देवाचार्य महाराज

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची समाजाला आवश्यकता आहे. समिती आणि सनातन संस्था यांना आमचा आशीर्वाद आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय चतुर संप्रदाय आखाड्याचे यवतमाळ (महाराष्ट्र) येथील महामंडलेश्वर सावरिया देवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले.

अन्य संतांच्या घेतलेल्या भेटी

१. हनुमान गढीचे महंत बलरामदास महाराज, राजस्थान येथील श्री महंत रामप्रसाद दास महाराज, श्री महंत पुरुषोत्तमदास महाराज, श्री लालदास राम जानकी जनसेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्री बलरामदास महाराज, राजस्थान येथील महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री सियारामदास महाराज, महामंडलेश्वर ईश्वरदास महाराज यांची भेट घेण्यात आली.

२. हरियाणा (पलवर) येथील श्री महेश्वरदास महाराज म्हणाले, ‘‘जेव्हा धर्मावर संकट येते, तेव्हा भगवंत स्वत: कुणाच्या तरी रूपात येऊन धर्माची पुनर्स्थापना करतात. आता समाजात अशाच घटना घडत आहेत. तुमचे कार्य चांगले आहे.’’