जगाने वर्ष २०१९ मध्ये ९३ कोटी १० लाख टन अन्न वाया घालवले !

भारतात प्रतिवर्षी प्रतिव्यक्ती ५० किलो अन्न वाया घालवले जाते !

एकीकडे जगातील कोट्यवधी लोक उपाशी किंवा अर्धपोटी असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात अन्न वाया घालवणे, हा मोठा गुन्हाच होय ! प्रत्येक देशाने अन्न वाया घालवण्याच्या विरोधात कायदा करून कठोर शिक्षेची तरतूद करणे आता अपरिहार्य झाले आहे. घरासह हॉटेल, समारंभ, विवाह, मेजवान्या आदी ठिकाणी अन्न वाया घालवण्याचे प्रकार अधिक प्रमाणात घडतात, त्याकडे लक्ष ठेवणारी यंत्रणा स्थापन करणेही आता तितकेच महत्त्वाचे झाले आहे !

नवी देहली – जगभरात वर्ष २०१९ मध्ये ९३ कोटी १० लाख टन अन्न वाया घालवण्यात आले. एकूण उपलब्धतेच्या ते १७ टक्के होते, असे संयुक्त राष्ट्रांकडून बनवण्यात येणार्‍या ‘फूड वेस्ट इंडेक्स’च्या वर्ष २०२१ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे. घर, किरकोळ व्यापारी, हॉटेल आदी ठिकाणी अन्नपदार्थांचे सेवन करतांना ते वाया घालवण्यात आल्याचे यात म्हटले आहे.

घरांमध्ये सर्वाधिक वाया घालवले जाते अन्न !

अहवालानुसार जगभरात प्रत्येक व्यक्तीमागे प्रतिवर्षी १२१ किलो अन्न वाया घालवले जात आहे. यात घरांमध्ये सरासरी ७४ किलो अन्न वाया घालवले जाते. दक्षिण आशियातील देशांमध्ये भारतात प्रतिवर्षी प्रतिव्यक्ती ५० किलो अन्न वाया घालवले जाते. त्या तुलनेत अफगाणिस्तान ८२ किलो, नेपाळ ७९, श्रीलंका ७६, पाकिस्तान ७४ आणि बांगलादेश ६५ किलो प्रतिव्यक्ती अन्न वाया घालवतो.

वर्ष २०१९ मध्ये ६९ कोटी लोक अर्धपोटी होते. कोरोनाच्या काळात या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ३०० कोटी लोकांना आरोग्याला आवश्यक अन्न मिळत नाही, असेही या अहवालात म्हटले आहे.