विधानसभेत वैधानिक विकास मंडळाच्या निवडीवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी !

डावीकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात वैधानिक विकास मंडळ सिद्ध करण्याच्या कारणावरून खडाजंगी झाली. ‘वैधानिक विकास मंडळाची लगेच स्थापना करावी’, अशी मागणी भाजपकडून १ मार्च या दिवशी विधानसभेत करण्यात आली; मात्र ‘जोपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरी करत नाहीत, तोपर्यंत विदर्भ-मराठवाडा विकास मंडळ सिद्ध करणार नाही’, अशी चेतावणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. त्यांच्या या चेतावणीनंतर विधानसभेत विरोधकांनी गोंधळ घालत ‘राज्यपाल आणि विदर्भ-मराठवाडा विकास मंडळ याचा संबंध काय ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला.

१. ‘जर राज्य सरकारने विदर्भ-मराठवाडा विकास मंडळ सिद्ध करून त्याला निधी दिला नाही, तर तो आम्ही संघर्षाने मिळवू’, अशी चेतावणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिली.

२. ते पुढे म्हणाले की, आम्ही भीक मागत नाही आणि आम्ही भिकारी नाही. आम्ही राज्यघटनेनुसार आमचा हक्क मागत आहोत. त्यामुळे केवळ १२ आमदारांसाठी ओलीस न ठेवता मंडळाची लगेच स्थापना करा, अशी हात जोडून विनंती आहे.

३. या वैधानिक विकास मंडळाची विदर्भ-मराठवाड्याच्या जनतेला आवश्यकता असून सर्वच क्षेत्रांत मागे असलेल्या क्षेत्रातील गरीब जनतेला या निधीमुळे साहाय्य होते. त्यामुळे हा निधी विदर्भ-मराठवाड्याच्या जनतेला मिळावा, यासाठी हे मंडळ सिद्ध करण्यात यावे, अशी विनंती भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

या वेळी विरोधकांनी निषेध करून सभात्याग केला.