श्रीमती शकुंतला डुंबरे (वय ८१ वर्षे) यांना झालेले शारीरिक त्रास, त्यांना होमिओपॅथी औषधांचा झालेला लाभ आणि त्यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा !

श्रीमती शकुंतला डुंबरे

‘मला होत असलेल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास यांमुळे मी पुष्कळ त्रासले होते.

१. शारीरिक त्रास

१ अ. अनेक वेळा डोक्याला आणि शरिराला मार लागणे अन् होमिओपॅथीचे ‘अर्निका’ हे औषध घेतल्यावर बरे वाटणे

१. काही वर्षांपूर्वी माझ्या डोक्यावर आणि टाळूवर मोठी फळी पडली.

२. एकदा एक मोठा बांबू माझ्या डोक्यावर पडला.

३. दोन वेळा मी भिंतीवर जोरात आपटले होते.

४. त्या आधी एकदा मी मार्गिकेतून जात असतांना एक बालसाधिका जोरात धावत येऊन माझ्यावर आदळली. त्यामुळे मी जोरात मागे आपटले होते. तेव्हा क्षणभर ‘काय झाले ?’, ते मला कळलेच नाही. त्या वेळी मी वैद्यांना सांगितले, ‘‘मला केवळ ‘अर्निका’ द्या. दुसरे काही नको.’’ त्यांनी माझ्या तोंडात ‘अर्निका’च्या गोळ्या घातल्या. त्यानंतर अर्ध्या-पाऊण घंट्याने मी उठून भोजनकक्षात जेवायला गेले.

या सगळ्या त्रासांमुळे आणि वयपरत्वे (वय ८१ वर्षे पूर्ण) माझ्या डोक्यात ‘घण्ण’ असा सतत आवाज येतो.

१ आ. मला एका कानाने ऐकू येत नाही. मला दुसर्‍या कानाने आवाज ऐकू येतो; पण शब्द कळत नाहीत.

१ इ. मला पुष्कळ विसरायला होते.

१ ई. मागील ४३ वर्षांपासून माझे एक मूत्रपिंड निकामी झाले असून माझे एकच मूत्रपिंड कार्यरत आहे.

२. हृदयविकाराचा झालेला त्रास

२ अ. रात्री हृदयविकाराचा झटका येणे : अनुमाने एक वर्षापूर्वी मी घरून आश्रमात येऊन-जाऊन सेवा करत होते. एका रात्री अडीच वाजता ‘माझे हृदय कुणीतरी मुठीत धरून आवळत आहे’, असे मला वाटत होते. मी उठून मुलाला हाक मारली आणि त्याला मला रामनाथी आश्रमात न्यायला सांगितले. माझा ‘इ.सी.जी.’ काढल्यावर आधुनिक वैद्यांनी मला लगेच रुग्णालयात न्यायला सांगितले. रात्रीची वेळ असल्याने मला एका या खासगी रुग्णालयात नेले.

२ आ. आधुनिक वैद्यांनी महागडे विदेशी ‘चाळीस सहस्र रुपयांचे ‘इंजेक्शन’ द्यावे लागेल’, असे सांगणे, जावयाने ‘देशी ‘इंजेक्शन’ स्वस्त असून तेवढेच परिणामकारक आहे’, असे सांगणे : तेथील आधुनिक वैद्यांनी तपासणी केल्यावर मला ‘चाळीस सहस्र रुपयांचे एक ‘इंजेक्शन’ घ्यावे लागेल’, असे सांगितले. अनिरुद्धने (मुलाने) तसे त्याच्या बहिणीला (माझ्या मुलीला – सौ. शुभा सावंत हिला) भ्रमणभाष करून कळवले. तेव्हा जावयाने सांगितले, ‘‘चार सहस्र रुपयांचेही एक देशी ‘इंजेक्शन’ आहे. पन्नास सहस्र रुपयांचे विदेशी ‘इंजेक्शन’ आहे. दोन्ही ‘इंजेक्शने’ सारखीच परिणामकारक आहेत.’’ मग मला ते देशी ‘इंजेक्शन’ दिले गेले; पण त्याआधीच मला बरे वाटले होते.

२ इ. बांबोळी येथील सरकारी रुग्णालयात नेणे, त्यानंतर आठ दिवसांनी पू. सुमन नाईक रुग्णालयात भेटायला येणे आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी आधुनिक वैद्यांनी घरी जाण्याची अनुमती देणे : मला बांबोळीला रुग्णालयात न्यायचे ठरले. त्या वेळी मला श्री. सुदिन ढवळीकर यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. बांबोळीला गेल्यावर मला आश्रमातील कु. मनीषा राऊत या साधिकेचे पुष्कळ साहाय्य झाले. तेथे भरती झाल्यावर पुन्हा माझी तपासणी केली आणि रक्त पातळ करण्यासाठी मला पोटात १५ ‘इंजेक्शने’ दिली. खरेतर २ – ३ दिवसांतच मी बरी झाले होते. त्यानंतर ८ दिवसांनी मी घरी जाण्याची अनुमती मागितली. तेव्हा त्यांनी मला ‘अजून १५ दिवस रहावे लागेल’, असे सांगितले. त्याच रात्री ८ वाजता सनातनच्या संत पू. सुमन नाईक मला भेटायला आल्या आणि दुसर्‍याच दिवशी मला घरी जाण्याची अनुमती मिळाली.

२ ई. आधुनिक वैद्यांनी ‘एन्जिओग्राफी’मुळे दुसर्‍या मूत्रपिंडालाही धोका होऊ शकतो’, असे सांगणे : घरी जाण्यापूर्वी तळमजल्यावर काही आधुनिक वैद्य मला तपासून पुढच्या उपचारांविषयी सांगत होते. त्या वेळी मी त्यांना सांगितले, ‘‘गेली ४३ वर्षे माझे एकच मूत्रपिंड कार्यरत आहे.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘एन्जिओग्राफी’मुळे दुसर्‍या मूत्रपिंडालाही धोका होऊ शकतो.’’ ते आधुनिक वैद्य माझी मुलगी सौ. शुभा सावंत हिच्या नातेवाइकांपैकी होते.

२ उ. हृदयविकाराची लक्षात आलेली कारणे

२ उ १. ‘होमिओपॅथिक प्रथमोपचार’ या पुस्तकात ‘जड वजन उचलल्यास हृदयविकाराचे दुखणे होऊ शकते’, असे वाचनात येणे, त्यानंतर होमिओपॅथी वैद्यांचेे औषध घेणे आणि त्यांचे औषध घेतल्यावर बरे वाटणे : त्या वेळी शुभाही माझ्या समवेत होती. घरी गेल्यावर मी माझ्याकडे असलेल्या ‘होमिओपॅथिक प्रथमोपचार’ या पुस्तकात ‘जड वजन उचलले, तर हृदयविकाराचे दुखणे होऊ शकते’, असे वाचले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मी जड वजन उचलले होते.’ मी एका होमिओपॅथी वैद्यांचे औषध घेतले आणि बरी झाले.

२ उ २. दुसर्‍यांदा छातीत दुखणे

२ उ २ अ. जड गादी उचलल्यामुळे पुन्हा हृदयात वेदना होणे, पुन्हा ‘इ.सी.जी’ काढण्यात येऊन ‘मणिपाल’ या दुसर्‍या एका खासगी रुग्णालयात भरती करणे : त्यानंतर एकदा जड गादी उचलल्यामुळे पुन्हा माझ्या छातीत थोडे दुखले; म्हणून माझा ‘इ.सी.जी’ काढला. तेव्हा मला मणिपाल रुग्णालयात पाठवले. मी पलंगावर झोपल्यावर माझ्या दोन्ही हातांना एक रक्तदाब पहाण्यासाठी आणि दुसरे ‘इ.सी.जी.’ काढण्यासाठी २ यंत्रे लावली. अर्ध्या-अर्ध्या घंट्याने रक्तदाब मोजण्याचे यंत्र चालू झाल्यावर माझा दंड फार दुखायचा. मी सर्वसाधारण बरी होते. मी स्वतःहून उठून प्रसाधनगृहात जाऊ शकत होते; पण आधुनिक वैद्य मला जाऊ देत नव्हते.

२ उ २ आ. रुग्णाला पहाण्यासाठी फेरी मारणार्‍या एका शिकाऊ आधुनिक वैद्याला साधिकेने ‘मला एकच किडनी आहे’, असे सांगितल्यावर ‘एन्जिओप्लास्टी’ रहित करून दुसर्‍याच दिवशी घरी जाण्याची अनुमती मिळणे : मधून-मधून एक शिकाऊ (ज्युनिअर) आधुनिक वैद्य फेरी मारायला यायचे. एकदा मी त्यांना ‘मला एकच किडनी आहे’, असे सहजच सांगितले. त्यांनी ते मुख्य आधुनिक वैद्यांना सांगितले असावे; कारण त्यांनी दुसर्‍याच दिवशी मला घरी जाण्याची अनुमती दिली. बहुधा तेव्हा त्यांनी माझी ‘एन्जिओप्लास्टी’ करायची सिद्धता केली होती. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच माझी ‘एन्जिओप्लास्टी’ टळली’, हे मात्र खरे.

३. ‘नियमित घेतलेल्या होमिओपॅथीच्या ‘अर्निका’ या गोळ्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा’ यांमुळे शस्त्रकर्म टळून बरी होणेे

पहिल्या वेळी आलेल्या हृदयविकाराच्या वेळी पू. सुमनमावशी रुग्णालयात आल्यानेे आणि दुसर्‍या वेळी मी आधुनिक वैद्यांजवळ बोलल्यामुळे माझी ‘एन्जिओप्लास्टी’ करण्याचे रहित झाले. ‘मला हृदयविकाराचा झटका आला नसून वजन उचलल्यामुळे हृदयाला झालेला त्रास होता’, हेही समजले. मी नियमितपणे ‘अर्निका’ या गोळ्या घेतल्या. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे हे सर्व झाले, नाहीतर मला औषधे घेऊन लोळत पडावे लागले असते. केवळ ३ दिवसांचे देयक २७ सहस्र ५०० रुपये झाले.’

– श्रीमती शकुंतला डुंबरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(९.९.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक