पश्‍चिम महाराष्ट्रात १ सहस्र ८७६ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजचोर्‍या उघडकीस

कोल्हापूर, २ फेब्रुवारी – वीजतारांवर आकडे टाकून किंवा मीटरमध्ये फेरफार करून विजेचा वापर करणार्‍या वीज चोरीविरोधात महावितरणने मोहीम चालू केली आहे. गेल्या दीड मासात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये  विशेष मोहिमेमध्ये घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील १ सहस्र ८७६ ठिकाणी ४ कोटी ५७ लाख रुपयांच्या वीजचोर्‍या महावितरणने उघडकीस आणल्या आहेत. या वीजचोरांच्या विरोधात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ प्रमाणे फौजदारी कारवाई  करण्यात येत आहे. (एवढ्या वीजचोर्‍या होईपर्यंत प्रशासन झोपा काढत होते का ? – संपादक)

वीजचोरी करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे प्रादेशिक विभागात धडक मोहीम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत ५६६ प्रकरणांमध्ये ९९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ३५ ठिकाणी ५ लाख २० सहस्र रुपयांच्या वीजचोर्‍या उघडकीस आल्या आहेत. वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीजवापराप्रमाणे संपूर्ण देयक रक्कम भरलेले नाही, त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.