औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेक्षाध्यक्ष, भाजप

पुणे – औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हे राजकीय किंवा निवडणुकीचे सूत्र नसून तो आमच्या श्रद्धेचा विषय आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मागणी शिवसेनेने लावून धरावी. काँग्रेसचा त्याला विरोध असून त्यावर शिवसेनेने काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा प्रश्‍न आहे. त्यांच्यातील विसंवादाशी आम्हाला काहीही घेणेदेणे नाही. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे, ही आमची १०० टक्के भूमिका आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या सूत्रावरून स्वत:चे मत व्यक्त केले. अजूनही देशात औरंगजेबाविषयी लोकांना प्रेम वाटते का ?, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

मुंबई महापालिका निवडणुकीवर थेट देहलीहून लक्ष दिले जाईल, अशी रणनीतीही चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली. पुष्कळ प्रवास करून पक्ष संघटना भक्कम करणे, हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे, असे त्यांनी सांगितले.