दिवे घाट (पुणे) येथे वारीच्या काळात इंद्रवज्राचे (संपूर्ण इंद्रधनुष्य) दुर्मिळ दर्शन !

सासवड परिसरात विठ्ठलाच्या मूर्तीजवळ आकाशात निर्माण झालेले इंद्रवज्र

पुणे, १२ जुलै (वार्ता.) – आषाढी वारीच्या पावन वातावरणात लाखो वारकरी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या अखंड नामघोषात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असतांना, दिवे घाट येथे आकाशात इंद्रवज्राचे (संपूर्ण इंद्रधनुष्य) दुर्मिळ दर्शन घडले. हा विलक्षण निसर्गाविष्कार पाहून वारकरी भावविभोर झाले. अनेक ज्येष्ठ वारकर्‍यांनी ‘वारीत असा योग यापूर्वी कधी अनुभवला नव्हता’, अशी भावना व्यक्त केली आणि याला श्रीविठ्ठलाची कृपा अन् मंगल आशीर्वाद मानले. वारी मार्गावरील सासवड परिसरात विठ्ठलाच्या मूर्तीजवळ आकाशात निर्माण झालेल्या या पूर्ण इंद्रधनुष्याचे दर्शन अनेक वारकरी आणि भाविक यांनी त्यांच्या भ्रमणभाषवर चित्रीत केले. काही क्षण टिकलेल्या या मनोहारी दृश्याने संपूर्ण परिसर भक्तीमय आणि आनंदमय झाला.

आकाशात दिसणारे इंद्रवज्र (आकाशात तयार होणारे गोलाकार इंद्रधनुष्य)

अध्यात्मशास्त्रानुसार इंद्रधनुष्य हे निसर्गातील ७ रंगांचे दैवी संतुलन आणि सृष्टीतील चैतन्याचे प्रतीक मानले जाते. संपूर्ण इंद्रधनुष्य किंवा इंद्रवज्राचे दर्शन हे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. भक्तीभावाने केलेले नामस्मरण, सामूहिक प्रार्थना आणि सात्त्विक वातावरण यांमुळे निर्माण होणार्‍या दैवी चैतन्याचे हे शुभ संकेत असल्याची श्रद्धा अनेक भाविकांनी व्यक्त केली. या दुर्मिळ निसर्गदर्शनाने यंदाच्या आषाढी वारीला एक विशेष आध्यात्मिक आणि अविस्मरणीय महत्त्व प्राप्त झाले आहे.