कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच विकास प्रकल्प राबवणार ! – माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ते आशिष शेलार

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही !

मुंबई – ‘मानवी उत्क्रांती’च्या इतिहासाचे महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचे नियोजन करण्यात येईल. तसेच कातळशिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा सिद्ध करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ते आशिष शेलार यांनी ७ जुलैला विधानसभेत दिली. विधानसभेत आमदार विठ्ठल लंघे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून कातळशिल्पावरील चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, विक्रांत पाचपुते, नाना पटोले यांनी भाग घेतला.

चर्चेतील महत्त्वाची सूत्रे !

१. कोकणातील रत्नागिरी विभागातील ३०० कि.मी. क्षेत्रात २ सहस्रांपेक्षा अधिक कातळशिल्पे आणि १५० हून अधिक कातळशिल्पांची स्थळे आढळली आहेत.

२. या वारशाच्या प्रसिद्धीसाठी १४.५० कोटींचा निधी संमत झाला असून कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मुख्य माहितीपट आणि ९ लघु माहितीपट सिद्ध केले जाणार आहेत.

३. पर्यटनवाढीसाठी पायाभूत सुविधांचा आराखडा सिद्ध असून संरक्षण भिंतींचे काम चालू झाले आहे. स्थानिक खासगी जागामालकांनाही याचा लाभ होईल.

या भागात होणार्‍या विकास प्रकल्पांमुळे ही कातळशिल्पे धोक्यात आल्याचा सदस्यांनी जे सूत्र उपस्थित केला. त्याला उत्तर देतांना मंत्री शेलार यांनी सांगितले की, भारतीय पुरातत्व खाते, राज्यशासनाच्या पुरातत्व विभागाच्या अनुमतीशिवाय कोणत्याही प्रकारचा प्रकल्प होणार नाही. तसेच या कातळशिल्पांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही.

संपादकीय भूमिका

चांगलीच गोष्ट आहे; परंतु ते ‘मानवी उत्क्रांतीचे पुरावे’ नसून मुळातच उत्क्रांतीच्या वरच्या स्तरावर जन्माला आलेल्या येथील मानवाच्या संस्कृतीचे ते पुरावे आहेत, असेच म्हटले पाहिजे !