मंत्रालयाच्या बाहेरच राजकीय नेत्यांच्या अनधिकृत होर्डिंगजची उभारणी !

प्रतिदिन अनधिकृत होर्डिंग काढणे, ही महानगरपालिकेसाठी ठरत आहे डोकेदुखी !

(होर्डिंग म्हणजे मोठे फलक)

श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई

मंत्रालयाबाहेर मंत्र्यांच्या निवास्थानाच्या येथील अनधिकृत होर्डिंग काढतांना मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी

मुंबई, ५ जुलै (वार्ता.) – महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या परिसरात नियमितपणे राजकीय नेत्यांचे शेकडो अनधिकृत होर्डिंग लावले जात आहेत. हे होर्डिंगज एकदा काढल्यावर दुसर्‍या दिवशी त्याच जागेवर पुन्हा दुसरे होर्डिंग लावले जातात. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. त्यामुळे हे अवैध होर्डिंग्जा काढणे मुंबई महानगरपालिका प्रशासनासाठी एकप्रकारे डोकेदुखी ठरत आहे. यांत प्रशासनाचे मनुष्यबळ, वेळ आणि पैसा वाया जात आहे.

सार्वजनिक जागेत अनधिकृतपणे होर्डिंग लावल्यास कारवाई करण्याचे शासन निर्णय मंत्रालयातूनच काढले जातात; परंतु मंत्रालयाच्या प्रवेशद्वारांच्या बाहेर आणि परिसरात शेकडो होर्डिंगज लावण्यात येत आहेत. मंत्रालयाच्या बाहेर लागलेले अनधिकृत होर्डिंगज म्हणजे ‘दिव्याखाली अंधार’ अशी स्थिती आहे.

अनधिकृत होर्डिंग काढण्याचे काम दिवसभर करावे लागते ! – मुंबई महानगरपालिका कर्मचारी

याविषयी होर्डिंग काढणार्‍या कर्मचार्‍यांनी सांगितले, ‘‘मंत्रालयाच्या परिसरापासून ते कुलाब्यापर्यंत मुंबई महानगरपालिकेची एक मालवाहक गाडी नियमितपणे अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी फिरते. गाडीसह ४-५ कर्मचार्‍यांना हे काम करण्यासाठी दिवसभर गुंतून रहावे लागते. या परिसरात एवढे होर्डिंगज असतात की, ते काढण्यासाठी प्रतिदिन ८ घंटे वेळ द्यावा लागतो.

मंत्र्यांना वावगे वाटत नाही का ?

श्री. प्रीतम नाचणकर

मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर रस्त्याच्या कडेला मंत्र्यांची निवासस्थाने आहेत. निवासस्थानांच्या बाहेर संरक्षक भिंतीवरही होर्डिंगज लावले जातात. राज्यभरातील राजकीय पक्षांचे अतीउत्साही कार्यकर्ते मंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी होर्डिंगज लावतात. अशा प्रकारे अवैधरित्या होर्डिंग लावून सार्वजनिक ठिकाणे विद्रूप होऊ नयेत, याची जाणीव खरेतर मंत्र्यांना असणे अपेक्षित आहे; पण दुर्दैवाने तसे होतांना दिसत नाही. कदाचित् मंत्र्यांनी सूचना देऊनही यंत्रणेकडून कार्यवाही होत नसेल, असेही असू शकेल; परंतु अवैध होर्डिंग लागत आहेत, ही वस्तूस्थिती आहे.

स्वतःवर कारवाई होण्याच्या भीतीने पोलीसच कारवाई करण्याचे टाळतात !

मंत्रालयाच्या परिसरात लावण्यात येणारे जवळजवळ सर्वच होर्डिंग राजकीय असतात आणि ते राजकीय पदाधिकार्‍यांचे असतात. ‘होर्डिंग लावणार्‍यांना हटकल्यास स्वत:वरच कारवाई होईल’, या भीतीने पोलीस कारवाई करत नाहीत’, असे एका पोलिसाने सांगितले.

शहरांपासून गावोगावी होर्डींग्जद्वारे विद्रूपीकरणाला जबाबदार कोण ?

सद्यःस्थितीत राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात भव्य होर्डिंग लावलेले आढळतात. हे स्तोम गाव आणि खेडोपाडी येथेही पोचले आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणे विद्रूप दिसतात. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी कारवाई होत नसल्यामुळे हे स्तोम राज्यभर पसरले आहे. यावर वेळीच आणि गांभीर्याने कारवाई न झाल्यामुळेच राज्यात सर्वत्रच अनधिकृत होर्डिंगजची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

संपादकीय भूमिका

  • मंत्रालयाच्या बाहेरचेच अनधिकृत होर्डिंग लावण्याचे प्रकार रोखू न शकणारे प्रशासन राज्यभरात अनधिकृत होर्डिंग लावण्याचे प्रकार कधीतरी रोखू शकतील का ?
  • होर्डिंग काढण्याचा खर्च ते लावणार्‍यांकडून वसूल करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, तरच असे प्रकार थांबतील !