41-Year Delay Case : ४१ वर्षे रखडलेल्या अपिलाविषयी सर्वोच्च न्यायालय अप्रसन्न

  • हत्या प्रकरणातील ७२ वर्षीय दोषीला अंतरिम जामीन

  • उत्तरप्रदेश सरकारला नोटीस

नवी देहली – एका हत्येच्या प्रकरणातील एका दोषीचे अपील तब्बल ४१ वर्षे प्रलंबित राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने तीव्र अप्रसन्नता व्यक्त करत संबंधित व्यक्तीला अंतरिम जामीन संमत केला. तसेच या विलंबासाठी उत्तरप्रदेश सरकारला नोटीस बजावली.
वर्ष १९८३ मध्ये विजय सिंह यांच्या भावाची हत्या झाली होती. या प्रकरणी १९८५ मध्ये कानपूर येथील एका सत्र न्यायालयाने विजय सिंह यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तेव्हा त्यांचे वय २८ वर्षे होते. त्यानंतर सिंह यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान (अपील) दिले. अपील प्रलंबित असतांना त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर ४ दशके ते जामिनावरच बाहेर होते.

फेब्रुवारी २०२६ मध्ये, म्हणजे ४१ वर्षांनंतर उच्च न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळून लावत सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सध्या ७२ वर्षांचे असलेले विजय सिंह वयोमानानुसार विविध आजारांनी त्रस्त असून जामिनाच्या कालावधीत त्यांचे वर्तन समाधानकारक राहिल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. याची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन संमत केला. तसेच संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे मागवून प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

संपादकीय भूमिका

विलंबाने मिळणारा न्याय, हा अन्यायच म्हणावा लागेल !