पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ‘आदर्श लोकशासन’ सरकार आणणार !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान

चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवर

अहिल्यानगर – भारतात ज्यांनी हिंदु अस्मिता जागृत ठेवली, अनेक आक्रमणांनंतरही सनातन धर्म जिवंत ठेवला आणि छत्रपती शिवरायांच्या नंतर लोकशासन अन् लोकप्रशासन यांचा आदर्श वस्तूपाठ घालून दिला, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मी नमन करतो. सरकार त्यांच्याप्रमाणे ‘आदर्श लोकशासन’ आणणार आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मे या दिवशी येथे केले. चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले की, मागील वर्षीच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील सर्व शक्तीस्थळांची पुनर्निर्मिती करण्याचा निर्धार सरकारने केला आहे. चोंडी येथील भव्य विकास आराखडा संमत झाला असून सध्या आचारसंहिता लागू असल्याने भूमीपूजन करता आले नाही; मात्र आचारसंहिता संपताच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व विकासकामांचे भूमीपूजन केले जाईल.