महापालिकेतील ३ अधिकार्‍यांचे तडकाफडकी निलंबन !

बोकडांच्या कत्तलीमुळे नदीत रक्तमिश्रित पाणी आल्याचे प्रकरण

मालेगाव – बकरी ईदनिमित्त दिल्या जाणार्‍या बोकडांच्या बळीमुळे येथील मोसम नदीत रक्तमिश्रित पाणी आले. या प्रकरणी महापालिकेतील ३ अधिकार्‍यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. मोसम नदीचे पाणी पुढे गिरणा धरणात जाते. त्यातील पाण्याचा वापर मालेगाव, नांदगाव आणि जळगाव जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये पिण्यासाठी म्हणून केला जातो. (या रक्तमिश्रित पाण्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? – संपादक) अवैध कत्तलीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेर्‍यांचीही व्यवस्था केली होती. (पोलिसांच्या कॅमेर्‍यात ही अवैध कत्तल दिसली नाही का ? कि त्यांनी जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केले ? या प्रकरणी पोलिसांनाही बडतर्फ करायला हवे ! – संपादक) 

आंदोलनाच्या दबावामुळे कारवाई ! 

नदी प्रदूषणाच्या प्रकरणी सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी गेल्या आठवड्यात आमरण उपोषण केले होते. तेव्हा प्रशासनाने आश्वासन दिले होते की, विशेष उपाययोजनांमुळे यंदा नदीत रक्तमिश्रित पाणी जाणार नाही. प्रत्यक्षात नदीत रक्तमिश्रित पाणी आल्याने बोरसे यांनी पुन्हा आंदोलन चालू केले. परिणामी अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी शहर अभियंता कैलास बच्छाव, स्वच्छता विभागाचे साहाय्यक आयुक्त अनिल पारखे आणि प्रभाग अधिकारी श्याम बुरकुल यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

संपादकीय भूमिका

  • केवळ महापालिकेतील अधिकार्‍यांचे निलंबन ही एकांगी कारवाई नव्हे का ? रस्त्यांत होणारी कत्तल रोखणे हे दायित्व पोलीस प्रशासन, महसूल आणि पशूसंवर्धन विभाग यांचेही असते. मग ती न रोखल्याने रक्तमिश्रीत पाणी नदीत आल्याप्रकरणी यातील संबंधितांवर कारवाई का झाली नाही ? 
  • या प्रकरणातील उत्तरदायींना पाठीशी घालणार्‍यांचीही चौकशी व्हायला हवी !