Bird Flue Nandurbar : नंदुरबार येथे ‘बर्ड फ्ल्यू’ आजाराचा उद्रेक : १ लाख ९३ सहस्र ६६७ कोंबड्या मारल्या !

८ लाखांहून अधिक अंडीही नष्ट

नंदुरबार – कोंबड्यांमुळे होणार्‍या ‘बर्ड फ्ल्यू’या आजाराच्या संसर्गामुळे नवापूर येथे गेल्या ४ दिवसांत १ लाख ९३ सहस्र ६६७ कोंबड्या मारण्यात आल्या. त्यांची ८ लाखांहून अधिक अंडीही नष्ट करण्यात आली आहेत. या भागातील नागरिकांना चिकन आणि अंडी खाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. २१.२२ मेट्रिक टन पशूखाद्य भूमीत गाडून नष्ट करण्यात आले आहे, अशी माहिती पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. संजय खाचणे यांनी दिली.

या पार्श्वभूमीवर १५० कर्मचार्‍यांच्या २५ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संसर्ग रोखण्यासाठी १ किलोमीटर, ३ किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा परिघांत क्षेत्र निश्चित करून उपाययोजना चालू करण्यात आल्या आहेत. कुक्कुटपालन केंद्रातील नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी दक्षता घेतली जात आहे.