लोकशाही मार्गाने न जाता सशस्त्र लढाच चालू ठेवणार !

नक्षलवाद्यांकडून सरकारला प्रसिद्धीपत्रकाद्वारे आव्हान !

प्रतिकात्मक छायाचित्र

गडचिरोली – १९७० च्या दशकातील मोठ्या धक्क्यानंतर ज्याप्रमाणे आम्ही पुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊन उभे राहिलो, त्याचप्रमाणे आताही पुनरुज्जीवित होऊ. आम्ही लोकशाहीच्या मार्गावर जाणार नसून सशस्त्र लढाच चालू ठेवणार आहोत, अशा शब्दांत नक्षलवादी संघटनेच्या ‘उत्तर तालमेल कमिटी’ने सरकारला प्रसिद्धीपत्रकाद्वारे आव्हान दिले आहे. या प्रकरणी गडचिरोली पोलीस सतर्क झाले असून जिल्ह्यात अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. तेथील परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे,

१. संघटनेचा एकेकाळचा सर्वोच्च नेता देवजीसह कोबाड आणि वेणुगोपाल हे शत्रूंचे दलाल आहेत. नेपाळमधील साम्यवादी चळवळ ज्याप्रमाणे मूळ डाव्या विचारांपासून भरकटली, तसाच प्रयत्न भारतातही चालू आहे.

२. क्रांतीचा मार्ग सोडून लोकशाहीच्या वाटेवर जाणे, म्हणजे चळवळीचा घात आहे. जनतेच्या सशस्त्र शक्तीविना कोणतीही क्रांती यशस्वी होऊ शकत नाही.

३. कार्ल मार्क्स, लेनिन यांच्यासह चारु मुजुमदार, बसवाराजू, राजू दा, कोसा दा आणि हिडमा या नेत्यांनी प्राणांची आहुती दिली; पण तडजोड केली नाही.

४. देवजीसारख्यांनी क्रांतीचा विचार सोडून बचावासाठी शरणागती पत्करली. भूमीगत रहाण्याऐवजी कायदेशीर चौकटीत जाणे, हा विघटनवाद असून अशा लोकांमुळे क्रांतीकारी चळवळ कमकुवत होणार नाही.

संपादकीय भूमिका

सरकारने या मूठभर नक्षलवाद्यांचाही तात्काळ बीमोड करावा !