रायगडावरील वणव्यात जलवाहिन्या आणि विद्युत् वाहिन्या जळून नष्ट 

  • १५ दिवसांतील दुसरी घटना

  • प्रतिबंधात्मक उपाय करण्याची ग्रामस्थ आणि शिवप्रेमी यांची मागणी

रायगड किल्ल्याच्या परिसरात वणवा

महाड (जिल्हा रायगड) – येथील रायगड किल्ल्याच्या परिसरात वणवा पेटल्याने मोठी हानी झाली. या आगीत किल्ल्यावर पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्या आणि विद्युत् वाहिन्या अनेक ठिकाणी जळून नष्ट झाल्या आहेत. खरेतर या जलवाहिन्या भूमीच्या खाली १ ते दीड फूट घालायला हव्यात; पण त्या भूमीवरच टाकण्यात आल्या होत्या. (अशा प्रकारे पाट्याटाकूपणे कामे करणार्‍यांकडून ही हानीभरपाई सव्याज वसूल करून घ्यायला हवी, म्हणजे पुन्हा असे प्रकार होणार नाहीत ! – संपादक) वनविभागाचे अधिकारी ‘रोप-वे’ने (दोरींवर लटकलेल्या वाहकांमध्ये प्रवाशांची वाहतूक करणार्‍या प्रणालीद्वारे) गडावर पोचले. वणवा विझवण्याचा प्रयत्न केला. येथील हिरकणीवाडीपासून वणवा थेट महादरवाजापर्यंत पसरला. टकमक टोक परिसरातील भाग आगीपासून वाचला.

येथे १५ दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे वणवा पेटला होता. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि शिवप्रेमी यांनी प्रशासनाने वणव्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय तातडीने करावेत, अशी मागणी केली आहे. (पुन्हा तिसर्‍यांदा वणवा लागू नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने प्रयत्न करावेत ! – संपादक)