दरोडेखोरांना चित्रपटांत नायक बनवू नका, पिढ्या बिघडतील ! – Yogi Adityanath

एक काळ असा होता, जेव्हा चांगल्या व्यक्तींना खलनायक आणि खलनायकांना नायक म्हणून दाखवले जात होते. त्याचे परिणाम म्हणून पिढ्या बिघडल्या.

योगी आदित्यनाथ

वाराणसी (उत्तरप्रदेश) – चित्रपट केवळ सादरीकरण नसून समाजाला दिशा देणारे माध्यम आहे. तरुण पिढीसमोर जसे चित्रपट ठेवले जातात, तसेच आदर्श ती स्वीकारते. म्हणूनच निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांनी राष्ट्राला प्रेरणा देणारे चित्रपट निर्माण करावेत. एखाद्या दरोडेखोराला नायक म्हणून दाखवले, तर तरुण पिढी त्यालाच आदर्श मानेल. दरोडेखोरांना नायक म्हणून सादर करू नका, असे आवाहन उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले. येथे त्यांनी सम्राट विक्रमादित्य यांच्या जीवनावर आधारित महानाट्य कार्यक्रमास उपस्थिती लावली. या वेळी ते बोलत होते. या महानाट्य कार्यक्रमात मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव उपस्थित होते.

देशाने दरोडखोरांना नाकारले !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘धुरंधर २’चा अप्रत्यक्ष उल्लेख करत म्हटले की, नव्या भारतात ‘डकैतां’ना (दरोडेखोरांना) समाजाने नाकारले आहे. सध्या चालू असलेले चित्रपट याचे उदाहरण आहेत की, जनता त्यांना कसा प्रतिसाद देते ? परंतु एक काळ असा होता, जेव्हा चांगल्या व्यक्तींना खलनायक आणि खलनायकांना नायक म्हणून दाखवले जात होते. त्याचे परिणाम म्हणून पिढ्या बिघडल्या.

उज्जैन आणि काशी यांचा संबंध

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, भारताच्या परंपरेत भावांतील आदर्श दाखवण्यासाठी राम-लक्ष्मण आणि कृष्ण-बलराम यांची जोडी आहे. त्याचप्रमाणे नाथ संप्रदायात संत भर्तृहरि आणि सम्राट विक्रमादित्य यांची जोडी मानली जाते. काशीमध्ये गंगा तटाच्या पलीकडे संत भर्तृहरि यांचे साधनास्थळ आहे, तर उज्जैन ही सम्राट विक्रमादित्य यांची कर्मभूमी होती.