श्री तुळजाभवानीदेवी चैत्र पौर्णिमा उत्सवासाठी ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या वतीने सुरक्षेला प्राधान्य !

भाविकांना उन्हामुळे त्रास होऊ नये; म्हणून उभारलेला मंडप
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रीन शेड मारुन करण्यात आली.

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत तुळजापूर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असल्याने ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या वतीने व्यापक सिद्धता केली आहे. आरोग्याच्या दृष्टीने प्रथमोपचार सुविधा, फळांच्या रसाचे वाटप, तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि दर्शन मंडप येथे कुलर अशा विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, सामान तपासणी यंत्र, अग्नीशमन यंत्रणा आणि नियंत्रण कक्ष यांद्वारे सतत देखरेख ठेवली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस, आरोग्य आणि नगरपालिका प्रशासन सतर्क ठेवण्यात आले आहे. या वेळी सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले आहे. प्रमुख मार्गांवर पिण्याचे पाणी आणि सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविकांना उन्हामुळे त्रास होऊ नये म्हणून ग्रीन शेड बांधण्यात आले आहे.
भाविकांना बीडकर पायर्‍या मार्गे प्रवेश देण्यात येणार असून तिथे दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांनसाठी फलक लावण्यात आले.

उत्सव काळात ३१ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत प्रतिदिन देवीची पारंपरिक छबीना मिरवणूक काढण्यात आली असून १ एप्रिल या दिवशी जोगवा झाला.

गर्दी नियोजनासाठी ३१ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत भाविकांना बीडकर पायर्‍यामार्गे प्रवेश देण्यात येणार असून ‘रेफरल’ (शिफारस करणे) आणि विशेष देणगी दर्शन पास काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

भाविकांनी दर्शनासाठी येतांना स्वच्छता आणि सुरक्षेची दक्षता घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या वतीने करण्यात आले आहे.