Naxal Free India : संसदेत ‘नक्षलवादमुक्त भारत’ मोहिमेवर चर्चा होणार !

नवी देहली – देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याच्या उद्दिष्टावर ३० मार्च या दिवशी संसदेत सविस्तर चर्चा होणार आहे. केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत भारताला नक्षलमुक्त करण्याची समयमर्यादा निश्चित केली असून या उद्दिष्टाच्या जवळ पोचल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

१. गेल्या १ वर्षात अनेक मोठ्या माओवादी नेत्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग स्वीकारला आहे. अलीकडेच २५ मार्च या दिवशी ओडिशामध्ये वांछित माओवादी नेता सुकृ याच्यासह ४ जणांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर एकूण ६६ लाख रुपयांचे पारितोषिक होते.

२. ओडिशा पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक संजीव पांडा यांच्या माहितीनुसार कंधमाल जिल्ह्यात आता केवळ ८ ते ९ नक्षलवादी उरले आहेत. ‘उर्वरित नक्षलवाद्यांनीही आत्मसमर्पण करावे’, असे आवाहन करत ‘सरकारच्या पुनर्वसन धोरणाचा पूर्ण लाभ दिला जाईल’, असे आश्वासन त्यांनी दिले. छत्तीसगडमधील दंडकारण्यातही प्रथमच नक्षल संघटना जवळपास नेतृत्वहीन झाली आहे. हे सरकारसाठी मोठे यश मानले जात आहे.