उत्तरप्रदेशात इंधनाचा काळाबाजार : १६ जणांना अटक

  • १२ सहस्र ७३२ ठिकाणी धाडी, तर १७७ जणांविरुद्ध गुन्हे नोंद  

  • इंधनपुरवठा पुन्हा सुरळीत

  • योगी आदित्यनाथ सरकारची धडक कारवाई

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एल्.पी.जी. यांचा काळाबाजार करणार्‍यांच्या विरोधात योगी आदित्यनाथ सरकारने धडक कारवाई केली. १२ मार्चपासून आतापर्यंत राज्यभरात १२ सहस्र ७३२ ठिकाणी धाडी घालण्यात आल्या असून १७७ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली असून १८५ संशयितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे. या धडक कारवाईमुळे राज्यभरात इंधनाचा पुरवठा पुन्हा सुरळीत झाला असल्याचे प्रशासनाने सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत अवैध विक्रीवर लगाम घातला.

राज्यातील इंधनपुरवठा स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यावसायिक एल्.पी.जी. सिलिंडर्सच्या वाटपात २० टक्क्यांची वाढ संमत करण्यात आली असून ती २३ मार्च २०२६ पासून लागू झाली आहे. यामुळे व्यावसायिकांनाही वेळेत गॅस उपलब्ध होत आहे. राज्यातील सर्व ४ सहस्र १०८ एल्.पी.जी. वितरकांकडे सध्या पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती सरकारने दिली. ग्राहकांना वेळेत सिलिंडर मिळावेत, यासाठी मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांना आवश्यक निर्देश दिले आहेत.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नियंत्रण कक्ष !

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अन्न आयुक्त कार्यालय आणि गृह विभाग येथे २४ घंटे नियंत्रण कक्ष चालू करण्यात आले आहेत. या ठिकाणी अधिकार्‍यांची पाळ्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली असून इंधन पुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे तत्काळ निवारण केले जात आहे. याखेरीज जिल्हा पुरवठा अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाची पथके प्रत्यक्ष  परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. इंधन आणि गॅसचा पुरवठा कोणत्याही व्यत्ययाविना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी शासन सतत देखरेख ठेवत आहे.आहे.

संपादकीय भूमिका

इतर राज्यांतही अशी धडक कारवाई व्हायला हवी, तरच काळाबाजार करणार्‍यांवर वचक बसेल !