धर्माभिमानी अधिवक्त्यांनी वैचारिक लढाईसाठी सिद्ध व्हावे ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

उत्तरप्रदेशातील अयोध्या, प्रतापगड आणि प्रयागराज येथे ‘राष्ट्र्भक्त अधिवक्ता समिती’ च्या बैठकांचे आयोजन 

प्रयागराज येथील बैठकीला उपस्थित अधिवक्ता

अयोध्या (उत्तरप्रदेश) – सध्या हिंदूंच्या विरोधात असलेल्यांनी एक वैचारिक युद्ध छेडले आहे. त्यामुळे बौद्धिक पातळीवरील लढाई जिंकण्यासाठी भारतीय कायद्यांचा अभ्यास करणार्‍या आणि हिंदूंची कायदेशीर बाजू भक्कम करण्यासाठी राज्यघटनेतील प्रावधानांचा योग्य अर्थ लावून हिंदूंसाठी समर्थपणे भूमिका पार पाडणार्‍या वैचारिक योद्ध्यांची आवश्यकता लागेल. त्यामुळे सर्व धर्माभिमानी अधिवक्त्यांनी या वैचारिक लढाईसाठी सिद्ध असले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. ‘राष्ट्र्रभक्त अधिवक्ता समिती’च्या वतीने उत्तरप्रदेशातील अयोध्या, प्रतापगड आणि प्रयागराज येथे अधिवक्त्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.

डावीकडून सौ. प्राची जुवेकर, अधिवक्ता पवन कुमार शक्ला, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी आणि ‘मिल्कीपूर बार असोसिएशन’ मध्ये मार्गदर्शन करतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ

या वेळी समितीचे श्री. विश्वनाथ कुलकर्णी आणि सौ. प्राची जुवेकर उपस्थित होते. ‘मुसलमानेतर महिलांना मुसलमान पुरुषाशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारणे आवश्यक आहे; पण काही कारणाने त्यांना घटस्फोट घ्यायचा असेल, तर एका लांब आणि गुंतागुंतीच्या कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागते. इस्लामनुसार एखादी महिला तिच्या मूळ धर्मात परतली, तर विवाह रहित होतो. या आधारे अशा मुसलमानेतर महिलांसाठी घटस्फोट प्रक्रिया सुलभ करावी’, अशी मागणी या बैठकांमध्ये करण्यात आली, तसेच या मागणीला देशभरातून पाठिंबा मिळवण्याचा निर्धारही करण्यात आला. या बैठकांमध्ये अयोध्या येथील ‘मिल्कीपूर बार असोसिएशन’चे अध्यक्ष अधिवक्ता पवन कुमार शक्ला, अधिवक्ता अमरजीत सिंह, अधिवक्ता घनश्याम मौर्य, प्रतापगड येथील अधिवक्ता नीरज तिवारी, तर प्रयागराज येथील अधिवक्ता ज्ञानेंद्र मिश्रा आणि अधिवक्ता धरणीधर पांडे आदी उपस्थित होते.

‘मिल्कीपूर बार असोसिएशन’चे अधिवक्ता सदस्य