कोकणात आंबा पिकाची ८० ते ९० टक्के हानी !

मंत्री भरतशेठ गोगावले यांनी विधानसभेत माहिती

अधिवेशन संपण्यापूर्वी विशेष बैठक आयोजित करून निर्णय घेणार !

मुंबई – कोकणात अवेळी पडलेल्या पावसामुळे आंबा मोहोराची अनुमाने ८० ते ९० टक्के हानी झाल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आंबा आणि काजू पिकांच्या हानीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री, कोकणातील आमदार आणि संबंधित मंत्री यांची बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी घेण्यात येईल. या बैठकीत शेतकर्‍यांना भरपाई कशी देता येईल ? याविषयी ठोस निर्णय घेतला जाईल, असे फलोत्पादन (Horticulture), रोजगार हमी योजना आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी ६ मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले.

अवेळी पडलेल्या पावसामुळे आंबा आणि काजू या पिकांच्या झालेल्या हानीविषयी आमदार  दीपक केसरकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री भरत गोगावले यांनी उत्तर दिले. आमदार शेखर निकम, सुनील प्रभू आणि प्रकाश सुर्वे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री गोगावले म्हणाले की, पाऊस, थंडी आणि  हवामानात अचानक होणारा पालट, तसेच कीडरोग यांमुळे कोकणात आंबा आणि काजू पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांनी संयुक्त पहाणी करून शासनाला अहवाल सादर केला आहे. प्राथमिक अहवालानुसार आंबा मोहोराची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. काजू पिकांवरही हवामान पालटाचा परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे. याविषयी क्षेत्रीय स्तरावर कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यांच्याद्वारे सविस्तर पहाणी चालू आहे.

यावर्षी आंबा पिकासाठी ६०४ कोटी रुपयांची विमा संरक्षित रक्कम असून त्यातील २३३ कोटी रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहेत. काजू पिकासाठी गतवर्षी १६ कोटी रुपये विम्यापोटी देण्यात आले होते. त्यापैकी ८ कोटी रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी होते. चालू वर्षात काजू पिकासाठी एकूण ९४ कोटी रुपयांची विमा संरक्षित रक्कम असून त्यांपैकी ४९ कोटी रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहेत, असे मंत्री गोगावले यांनी सांगितले.