आसाम : भाजपचे नेते तुलिराम रोंगहांग यांच्या घराला अपसमजातून आदिवासींनी आग लावली !

आदिवासींच्या भूमीवर अतिक्रमण केल्याच्या विरोधात उपोषणाला बसलेल्यांना अटक केल्याचा अपसमज

भाजपचे नेते तुलिराम रोंगहांग

हामरेन (आसाम) – आसाममधील वेस्ट कार्बी आंगलाँग जिल्ह्यात भूमीच्या जुन्या वादाला हिंसक वळण लागले. यामुळे आंदोलकांनी भाजपचे स्थानिक नेते आणि ‘कार्बी आंगलाँग स्वायत्त परिषदे’चे मुख्य कार्यकारी सदस्य तुलिराम रोंगहांग यांच्या घराला आग लावली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केला. यात किमान ३ जण घायाळ झाले.

१. गेले १५ दिवस पेलांगपी परिसरात ९ जण आरक्षित भूमींवरील अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषणाला बसले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी त्यांना रुग्णालयात हलवले. या वेळी त्यांना अटक करण्यात आल्याचा अन्य आंदोलक आदिवासींचा अपसमज झाला. त्यावरून संतापाचा उद्रेक झाला.

२. कार्बी आंगलाँग हा आदिवासीबहुल जिल्हा असून तो राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीच्या कक्षेत येतो. येथील मोठे क्षेत्र केवळ कुरणासाठी आरक्षित आहे. या भूमीवर बिगरआदिवासी लोकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करत स्थानिक संघटना अनेक दिवसांपासून त्यांच्या हकालपट्टीची मागणी करत आहेत. त्यासाठीच हे आमरण उपोषण चालू होते.

३. मुळात हे प्रकरण न्यायालयात असल्याने सरकार किंवा ‘कार्बी आंगलाँग स्वायत्त परिषद’ थेट कारवाई करू शकत नाही, असे रोंगहांग यांनी स्पष्ट केले आहे.