धार्मिक स्थळांच्या विकासासाठी ३ सहस्र ६६१ कोटी रुपये निधीला मान्यता !

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून महाराष्ट्र शासनाचा गौरव  

राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई – अष्टविनायक गणपति मंदिरे, श्रीक्षेत्र तुळजाभवानीदेवी मंदिर, श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर, चौंडी (अहिल्यानगर) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर (नाशिक), श्री करवीरनिवासीनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर आणि श्रीक्षेत्र भीमाशंकर या धार्मिक स्थळांच्या विकास आराखड्यासाठी माझ्या शासनाने ३ सहस्र ६६१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे, अशा शब्दांत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच्या विधीमंडळातील अभिभाषणात शासनाच्या कामाचा गौरव केला.

राज्यपालांच्या अभिभाषणातील महत्त्वाची सूत्रे !

१. वर्ष २०२७-२८ मध्ये नाशिक येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभपर्वाचे नियोजन आणि सुव्यवस्थापन यांसाठी ‘कुंभमेळा प्राधिकरणा’ची स्थापना करण्यात आली. या प्राधिकरणाद्वारे यात्रेकरूंसाठी परिवहन, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आणि सुरक्षा यांचे नियोजन करण्यात येईल.

२. गड-दुर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील ७८ ठिकाणी आधुनिक सोयी-सुविधायुक्त ‘नमो पर्यटन’ माहिती आणि सुविधा केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

३. मराठी भाषेला अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यावर विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची आवड निर्माण व्हावी; म्हणून ‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा’द्वारे पदविका अभ्यासक्रमासाठी १५४ विषयांचे संपूर्ण साहित्य मराठीत अनुवादित करण्यात आले आहे.

४. ‘महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५’च्या धोरणाद्वारे राज्यात ७० लाख ५० सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून त्यातून ५० लाख इतकी रोजगारनिर्मिती झाली आहे.

५. ‘विकसित महाराष्ट्र’ धोरणानुसार वर्ष २०४७ पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्स (५ लाख कोटी रुपये) करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. त्यासाठी ‘व्हिजन मॅनेजमेंट युनिट’ची स्थापना करण्यात आली आहे.