SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्र विधानभवनाच्या मार्गिकांतील कागदपत्रांचे ढिगारे प्रशासनाने अंतत: हटवले !

‘सनातन प्रभात’च्या वृत्ताचा परिणाम !

विधीमंडळ हे राज्याच्या प्रशासकीय कामकाजाचे मुख्य केंद्र ! ही वास्तू राज्याच्या प्रतिष्ठेचे केंद्र !

मुंबई, ३० जानेवारी (वार्ता.) : महाराष्ट्राच्या विधानभवनाच्या विविध मजल्यांवर असलेल्या मार्गिकांत अनेक वर्षांपासून पुस्तके आणि कागदपत्रे होती. धूळ खात पडलेल्या या गोष्टी अंतत: विधीमंडळ प्रशासनाने हटवल्या आहेत. त्यांची गोदामात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य प्रशासनाच्या मुख्य इमारतीमधील कागदपत्रांच्या गचाळ व्यवस्थेचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’ने १८ जुलै २०२५ च्या अंकात छायाचित्रांसह प्रसिद्ध केले होते. विधीमंडळ प्रशासनाने अंतत: याची नोंद घेतली आणि सुनियोजन करण्याचा प्रयत्न केला.

विधीमंडळातील एका मार्गिकेची आधीची स्थिती

विधीमंडळातील त्याच मार्गिकेची सुधारित स्थिती

‘सनातन प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर विधीमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी ‘मार्गिकेमध्ये कागदपत्रे नकोत’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. गेल्या २ महिन्यांपासून कागदपत्रांचे वर्गीकरण करून सर्व मजले आणि कक्ष यांतील अनावश्यक कागदपत्रे काढण्याचे काम चालू आहे. याविषयी एका प्रशासकीय अधिकार्‍याने ‘विधीमंडळाच्या सचिवांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये कागदपत्रे हटवण्याची सूचना दिली होती’, अशी माहिती ‘सनातन प्रभात’ला दिली.

यापूर्वी अशी होती विधानभवनाची दुरवस्था !

१. विधानभवनातील काही मजले कागदपत्रांनी भरून गेले होते.
२. पुरेशी कपाटे नसल्यामुळे कक्षांतील पटलांवर कागदपत्रांचे ढिगारे रचण्यात आले होते.
३. काही कक्षांमध्ये लादीवरही ढीगचे ढीग होते.
४. कक्षांच्या बाहेरील मार्गिकेमध्ये शेकडो पुस्तकांचे ढीग रचण्यात आले होते.
५. काही मजल्यांवर उद्वाहनाबाहेरील जागेत पुस्तकांचे ढीग होते.
६. काही जिन्यांच्या कोपर्‍यांचीही अशी अवस्था झाली होती.

या सर्व जागा आता मोकळ्या करण्यात आल्या आहेत.

सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर प्रसारित झालेले १८ जुलै २०२५ या दिवशीचे हे ते वृत्त →

↑↑↑ (सविस्तर वृत्त वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा) ↑↑↑