पालघरमध्ये कम्युनिस्टांचा मोर्चा !

मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार !

पालघरमध्ये कम्युनिस्टांनी काढलेला मोर्चा

पालघर – जिल्ह्यातील कष्टकरी, आदिवासी बांधवांचे विविध प्रलंबित प्रश्न, वनभूमी प्रश्न, स्मार्ट मीटर योजना, वाढती बेरोजगारी आणि विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) अन् त्यांच्या सहकारी संघटना यांच्या वतीने डहाणूच्या चारोटी नाक्यावरून भव्य मोर्चा काढण्यात आला. कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते (लाल वादळ) २० जानेवारीला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहेत. या वेळी तेथे साधारणतः २० ते २५ सहस्र आंदोलक उपस्थित असण्याची शक्यता आहे.

पालघर येथील मोर्चात पुरुष, महिला, तरुण-तरुणींसह लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पथकर नाक्यापासून चारोटी नाक्यापर्यंत २ किलोमीटरपर्यंत आंदोलकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलकांच्या खांद्यावर लाल झेंडे होते, तर छातीवर पक्षाचे बॅच लावलेले होते. (कम्युनिस्टांनी जेथे जेथे राज्य केले त्या भागाची, तेथील जनतेची हानीच केली आहे, हाच इतिहास आहे. त्यामुळे असे मोर्चे काढून काय लाभ होणार आहे ? – संपादक)

मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याची चेतावणी आंदोलकांनी दिली आहे. मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर एकूण ८०० पोलीस अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत.