सासष्टी येथे १ लाख रुपयांची मिठाई कह्यात घेतली

अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

मडगाव, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – सणासुदीच्या काळात होणार्‍या अन्नपदार्थांच्या वाहतुकीची तपासणी करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने मोहीम राबवली आहे. सासष्टी तालुक्यात दवर्ली आणि नुवे येथे मिळून अनुमाने १ लाख रुपयांची मिठाई कह्यात घेण्यात आली आहे.

दवर्ली येथे एका वाहनातून स्थानिक मिठाई उत्पादकांची मावाची वाहतूक चालू होती. यामध्ये कलाकंद, बर्फी आणि रबडी यांच्या पिशव्या उत्पादनाचे दिनांक, साठवणुकीच्या अटी यांसारख्या योग्य ‘लेबलिंग डिक्लरेशन’विना (उत्पादनातील आवश्यक घटकांची माहिती नमूद केल्याविना) आढळल्या. या वस्तूंवर उल्लेख करण्यात आलेला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’च्या – फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडिया) अनुज्ञप्तीचा क्रमांक चुकीचा आढळला, तर काही वस्तूंवरील दिनांक कालबाह्य झाला होता. या कारवाईत कलाकंद आणि बर्फी यांच्या ७८ सहस्र रुपये किमतीच्या पिशव्या नष्ट करण्यात आल्या. या परिसरातील ४ उत्पादन केंद्रांची तपासणी करण्यात आली. येथे अस्वच्छ स्थितीत काम चालू असल्याबद्दल संबंधिताला ५ सहस्र रुपये दंड ठोठावण्यात आला. नुवे परिसरातही ३२ सहस्र रुपये किमतीचा मावा कह्यात घेऊन तो नष्ट करण्यात आला. ही तपासणी नियुक्त अधिकारी संज्योत कुडाळकर, वरिष्ठ अधिकारी प्रिया देसाई आदींनी केली आहे.

‘सुराज्य अभियान’ने सणाच्या काळात खाद्यपदार्थांमध्ये होणार्‍या भेसळीवर आळा घालण्याची मागणी केली होती !

दसरा, दिवाळी आदी सणांच्या काळात खाद्यपदार्थांमध्ये होणार्‍या भेसळीवर आळा घालण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सामाजिक उपक्रमाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘सुराज अभियान’ने अन्न आणि औषध प्रशासन अन् जिल्हाधिकारी यांच्याकडे सप्टेंबर महिन्यात केली होती.