अक्षय्य तृतीयेचे महत्त्व, त्या दिवशी करायच्या धार्मिक कृती आणि त्याचे लाभ !

३० एप्रिल या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ आहे. त्या निमित्ताने….

१. वर्ष २०२५ मध्ये असलेल्या अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य

‘अक्षय्य तृतीया वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी असते. या दिवशी ७ कल्पांपैकी १ कल्प (१ कल्प म्हणजे ४.३२ अब्ज वर्षांचा कालावधी), म्हणजे ब्रह्मदेवाचा १ दिवस चालू झाला, तसेच त्रेतायुगाचा आरंभ याच तिथीला झाला होता. एकाच दिवशी असलेल्या कल्पादि आणि युगादि तिथीला ‘अक्षय्य तृतीया’ म्हणतात. या तिथीला रोहिणी नक्षत्र आणि बुधवार असेल, तर ही तिथी महापुण्यकारक असते. या वर्षी या दोन्ही योगांनी युक्त अशी अक्षय्य तृतीया ३०.४.२०२५ या दिवशी आहे.

२. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शास्त्रकारांनी सांगितलेल्या धार्मिक कृती केल्याने होणारे लाभ !

२ अ. गंगास्नान : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गंगास्नान केल्याने सर्व पातकांपासून मुक्ती होते. ज्यांना प्रत्यक्ष गंगा नदीत स्नान करणे शक्य नसेल, त्यांनी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे. ज्यांना हेही शक्य नसेल, त्यांनी स्नान करतांना गंगा नदीचे स्मरण करत स्नान करावे. यानेही गंगास्नानाचे फळ मिळते.

२ आ. शिवपूजा : ही तिथी रोहिणीयुक्त असल्याने भगवान शिवाची पूजा करून उदककुंभ (पाण्याने भरलेला कलश) दान केल्याने शिवलोकाची प्राप्ती होते.

२ इ. श्रीकृष्ण पूजा : या दिवशी श्रीकृष्णाला चंदनाने भूषित केल्याने वैकुंठलोक प्राप्त होतो. आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीला चंदनाने संपूर्ण लेपन करून नेहमीप्रमाणे पूजा केली, तरी हा लाभ होईल.

२ ई. श्रीविष्णु पूजा : या दिवशी भगवान श्रीविष्णूची यव (सातू) अर्पण करून पूजा करावी. यवांनी हवन करावे आणि यवांचे दान करावे, तसेच सक्तु (सातूचे पीठ) ग्रहण करावे. याने सर्व पापांचा नाश होतो.

२ उ. दान करणे : या दिवशी जप, दान, पितृतर्पण इत्यादी केल्याने ते अक्षय्य होते. या दिवशी सुवर्ण, अन्न आणि रस यांनी युक्त सूत्रवेष्टित उदककुंभ दान करावे. यासह यव, गोधूम (गहू), चणे, सक्तु आणि ग्रीष्मऋतूत होणारी सर्व प्रकारची धान्ये अन् दध्योदन (दहीभात) यांचे दान करणे उपयुक्त आहे.

२ ऊ. श्राद्ध करणे : ही तिथी युगादि असल्याने श्राद्धादी कर्म केल्याने २ सहस्र वर्षांपर्यंत पितरांची तृप्ती होते. या दिवशी समुद्रस्नान, जप, हवन, दानादि कृत्ये केल्याने अनंत फळ प्राप्त होते. युगादि तिथीच्या दिवशी पिंडरहित श्राद्ध करावे. ते शक्य नसल्यास तर्पण करावे.

श्री. अमर जोशी

२ ए. युगादि तिथीच्या वेळी रात्री भोजन करू नये.

या सर्व धार्मिक कृती करण्यास शास्त्रकारांनी सांगितले आहे. आपापल्या क्षमतेनुसार यापैकी अधिकाधिक कृती आचरणात आणून या तिथीचा सर्व स्तरांवर लाभ करून घेऊ शकतो.’

टीप : हा लेख ‘धर्मसिंधु आणि निर्णयसिंधु’ या ग्रंथांमधील सूत्रांचा आधार घेऊन लिहिला आहे. वेगवेगळ्या धर्मग्रंथांनुसार या सूत्रांमध्ये प्रांतीय किंवा शास्त्रीय भेद असू शकतात.’

– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा, फोंडा, गोवा. (१६.४.२०२५)