राजसत्ता आणि धर्मसत्ता !

उत्तरप्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ

उत्तरप्रदेशातील बरेली येथील अतिरिक्‍त सत्र न्‍यायालयाचे न्‍यायाधीश रवी कुमार दिवाकर हे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांच्‍या कार्याचे कौतुक करतांना म्‍हणाले, ‘‘जेव्‍हा एखादी धार्मिक व्‍यक्‍ती सत्तेच्‍या खुर्चीवर बसते, तेव्‍हा त्‍याचे चांगले परिणाम दिसून येतात.’’ या वेळी त्‍यांनी विख्‍यात तत्त्वज्ञ प्‍लेटो यांच्‍या तत्त्वज्ञानाचे उदाहरण दिले. प्‍लेटो यांच्‍या मते सत्तेचा प्रमुख हा धार्मिक असावा; कारण धार्मिक व्‍यक्‍तीचे जीवन आनंदाचे नसते, तर ते त्‍यागाचे आणि समर्पणाचे प्रतीक असते. देशाच्‍या आजच्‍या स्‍थितीचा अभ्‍यास केल्‍यास प्‍लेटो यांचे विधान सध्‍याच्‍या घडीला चपखल बसणारे आहे. ‘ज्‍या ठिकाणी धर्मसत्ता आणि राजसत्ता या एकत्र येऊन राज्‍यकारभार केला जातो, त्‍या ठिकाणी सुराज्‍य अवतरते’, असेही म्‍हटले जाते.

आजही आदर्श राज्‍य म्‍हणून रामराज्‍याचे दाखले दिले जातात. राम स्‍वतः अवतारी पुरुष होता. राजाने राजधर्माचे पालन करतांना स्‍वतःचे कुटुंबीय आणि राज्‍यातील जनता यांमध्‍ये दुजाभाव करू नये, हे श्रीरामाने विविध प्रसंगांतून दाखवून दिले. धर्माचे अधिष्‍ठान ठेवून राज्‍यकारभार कसा करावा ? याचा परिपाठच सार्‍या जगाला प्रभु श्रीरामाने घालून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनीही श्रीरामाच्‍या आदर्शांचे पालन करत राज्‍यकारभार केला. छत्रपती शिवरायांना संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदासस्‍वामी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले होते. कठीण प्रसंगांत निर्णय घेतांना ते त्‍यांचा सल्ला घेत असल्‍याचे दाखले शिवचरित्रात आढळतात. राजसत्तेला धर्मसत्तेची जोड मिळाली की, राज्‍यातील प्रजाही गुण्‍यागोविंदाने नांदते. जुलमी नंद घराण्‍याचा विनाश करून आर्य चाणक्‍य यांनी मगध देशाच्‍या गादीवर चंद्रगुप्‍त मौर्य यांना बसवले आणि स्‍वतः महामंत्री म्‍हणून राज्‍यकारभार पाहिला. सम्राट चंद्रगुप्‍त यांनी गुरुरूपाने लाभलेल्‍या आर्य चाणक्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली राज्‍याचा विस्‍तार बलुचिस्‍तान, अफगाणिस्‍तान, गांधार, हिंदुकुश पर्वतरांग ते काबूलपर्यंत वाढवला होता. स्‍वातंत्र्यानंतर आजतागायत सत्ता उपभोगणार्‍या बहुतांश नेतेमंडळींनी राजकीय सत्तेचा वापर स्‍वतःच्‍या तुंबड्या भरण्‍यासाठी केला. जनतेच्‍या सेवेच्‍या नावाखाली निवडून येणारी ही मंडळी आपल्‍या कार्यकाळात जनतेच्‍या समस्‍यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत येनकेन प्रकारेण धन गोळा करत असतात. आजही सत्तेत असणार्‍या काही सर्वपक्षीय मंत्र्यांची नावे कोट्यवधी रुपयांच्‍या भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणांत गुंतलेली आहेत; याउलट ‘धार्मिक प्रवृत्तीच्‍या राजकीय व्‍यक्‍तीला आपल्‍या प्रत्‍येक कृतीकडे भगवंताचे लक्ष आहे’, याची जाणीव असते. त्‍यामुळे धर्माधिष्‍ठित राज्‍यकारभार करून तो प्रसंगी धर्मधुरिणांचे मार्गदर्शन घेऊ शकतो. ‘राजा कालस्‍य कारणम्’, या उक्‍तीप्रमाणे राजा धार्मिक प्रवृत्तीचा असल्‍यास सुराज्‍य येऊ शकते ! यासाठी धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा संगम होणे प्रजेसाठी नेहमीच अनुकूल असते.

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.