डाव्या विचारांच्या लोकांना भरचौकात उभे करून गोळ्या घालून ठार करेन !

  • नक्षलवादावर आधारित ‘बस्तर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित !

  • चित्रपटात महिला पोलीस अधिकार्‍याचे विधान

  • जे.एन्.यू.मध्ये सैनिकांच्या हत्यांचा जल्लोष साजरा केला जात असल्याचा उल्लेख

(टीझर म्हणजे छोटे विज्ञापन)

मुंबई – ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी नक्षलवादाविषयी नवीन चित्रपट बनवला आहे. ‘बस्तर’ असे याचे नाव असून छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा बस्तरवरून हे नाव देण्यात आले आहे. ‘द केरला स्टोरी’चे सुदिप्तो सेन हेच याही चित्रपटाचे दिग्दर्शक असून यातही अदा शर्मा यांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाचा टीझर प्रसारित झाला आहे. यामध्ये अभिनेत्री अदा शर्मा यांचा नक्षलवादी आणि त्यांना साहाय्य करणारे साम्यवादी यांच्याविषयीचे वाक्य आहे. यात त्या म्हणतात, ‘‘उदारमतवादी आणि डाव्या विचारांच्या लोकांना भरचौकात उभे करून गोळ्या घालून ठार करेन !’’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचा निर्मात्यांचा दावा आहे.

टीझरमधील संवाद !

‘पाकिस्तानसमवेतच्या ४ युद्धांत आमचे ८ सहस्र ७३८ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले; पण तुम्हाला ठाऊक आहे का की, नक्षलवाद्यांनी आपल्या देशात १५ सहस्रांहून अधिक सैनिकांची हत्या केली आहे ? बस्तरमध्ये नक्षलवाद्यांनी आमच्या ७६ सैनिकांची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर देहलीतील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात (जे.एन्.यू.मध्ये) जल्लोष करण्यात आला. कल्पना करा, आपल्या देशाचे असे प्रतिष्ठित विद्यापीठ आपल्या सैनिकांच्या हौतात्म्याचा उत्सव साजरा करत आहे. असा विचार कुठून येतो ? हे नक्षलवादी बस्तरमध्ये भारताचे तुकडे करण्याचा कट रचत आहेत आणि मोठ्या शहरांमध्ये बसलेले डावे, उदारमतवादी अन् खोटे विचारवंत त्यांना साथ देत आहेत. ‘उदारमतवादी आणि डाव्या विचारांच्या लोकांना भरचौकात उभे करून गोळ्या घालून ठार करेन. मला तुम्ही फासावर चढवा. मी आय.पी.एस्. अधिकारी नीरजा माधवन्. जय हिंद !’