भारतात वर्ष १८४८ पूर्वीही स्त्रियांना शिक्षण मिळत होतेच !

‘पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षण मिळत नव्हते. इंग्रज आल्यानंतरच महिलांना भारतात शिक्षण खुले झाले’, असा अपप्रचार अनेकदा केला जातो. त्याचे खंडण करणारा लेख येथे देत आहोत.

महिला शिक्षणाविषयीचे प्रातिनिधिक छायाचित्र

पूर्वीच्या काळच्या थोर महिला शिकल्या नसतील कशावरून ?

कदाचित् वर्ष १८४८ पूर्वीच्या स्त्रिया गुरुकुलाऐवजी स्वकुलातच शिकत असाव्यात. घरचेच कुणी शिकवत असावे वा गुरु (शिक्षक) घरी येऊन शिकवत असावेत.

श्री. किशोर पौनीकर

१. वेदकाळात अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रा, याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी, ब्रह्मवादिनी गार्गी या स्त्रिया केवळ त्यांच्या विद्वत्तेसाठीच प्रसिद्ध नव्हत्या, तर त्या विद्वत् सभेत विद्वानांसह वाक्पटुताही करत.

२. विजयनगर साम्राज्यात तर सरकारी कार्यालयांमध्ये लेखनिक पदांवर किती तरी स्त्रिया होत्या.

३. पुढे १२ व्या शतकात मुक्ताबाई, मीराबाई आदी महिला संत स्वतंत्र कवणे रचत. त्यांची कवणे लिहायला लेखनिक समवेत असतील का ? त्या लेखन करू शकत असल्यानेच त्यांचे अभंग आज आपण वाचू शकतो.

४. या पुढे सांगायचे झाल्यास संत कान्होपात्रा, संत चोखामेळा यांची पत्नी सोयरा आणि बहीण निर्मळा या प्रचलित भाषेत अभंग रचत. घरी अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या या स्त्रिया लेखनिक ठेवू शकत असतील का ? वा काव्य प्रतिभेचा अत्युच्च आविष्कार म्हणून त्यांनी येनकेन प्रकारेण अक्षरओळख करून घेतली असेल ?

५. समर्थ रामदास संप्रदायातील आक्कास्वामी आणि वेणास्वामी यांचे स्थान रामदासी परंपरेत मोठे होते. संत वेणास्वामी या तर मिरजेच्या मठाच्या मठाधिपती होत्या. अक्षरज्ञानाविना का त्यांना विद्वत्तेची एवढी मोठी झेप घेता आली होती !

६. छत्रपती शिवरायांना घडवणार्‍या राष्ट्रमाता जिजाऊमाता, छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर ८ वर्षे औरंगजेबाला नामोहरम करणार्‍या राजाराम पत्नी ताराबाई राणी या अक्षरज्ञानाविना केवळ हुजर्‍यांच्या भरवशावर प्रशासनात तरबेज झाल्या !

७. पेशवे म्हटले की, आज अनेकांना त्यांच्या ऐश्वर्यशाली जेवणावळीच आठवतात; पण हे पेशवे छत्रपतींचे राज्य विस्तार करायला सतत लढायांमध्ये गुंतले असतांना पेशवाईच्या कारभारावर घरच्या स्त्रियांचे पूर्ण लक्ष असे. प्रसंगी राजव्यवहारात मसलती (सल्ले) देत. ‘त्या निरक्षरच होत्या’, असे म्हणण्याचे धाडस आपण करू शकतो का ?

८. मध्य भारतातील प्रतिष्ठित होळकर साम्राज्य आदर्श पद्धतीने सांभाळतांनाच देशभरातील मंदिरांचा जिर्णोद्धार आणि नद्यांना घाट बांधून संस्कृती रक्षणात मोलाची कामगिरी बजावणार्‍या, हातात शिवलिंग घेऊन न्यायदान करणार्‍या अहिल्याबाई होळकर या वर्ष १८४८ पूर्वीच होऊन गेलेल्या आहेत. या अहिल्याबाई खरच निरक्षर असू शकतील का ?

९. वर्ष १८२८ ला जन्मलेल्या साक्षात् रणरागिणी असलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वर्ष १८४२ मध्ये लग्न होऊन त्या झाशीला जाईपर्यंत अक्षरज्ञान मिळालेच नसावे का ?

१०. ‘भारत देशात वा महाराष्ट्रात स्त्रियांची पहिली शाळा १८४८ या वर्षी उघडली गेली’, असे म्हणून आम्ही काय दर्शवत आहोत ? याचा अर्थ ‘वर्ष १८४८ पूर्वी स्त्रियांना अक्षरज्ञानच नव्हते’, असे म्हणायचे आहे का ?

– श्री. किशोर पौनीकर, नागपूर (३.१.२०२४)

(श्री. किशोर पौनीकर यांच्या ‘फेसबूक’वरून साभार)