(म्हणे) ‘हिंदुत्वातून बाहेर पडलो नाही, तर लिंगायतांचे अस्तित्व नष्ट होईल  !’ – निजगुणानंद स्वामीजी

कर्नाटक राज्य सरकार पुरस्कृत कार्यक्रमात बळूर येथील निष्कल मंटपाचे निजगुणानंद स्वामीजी यांचे हिंदुद्रोही विधान !

निष्कल मंटपाचे निजगुणानंद स्वामीजी

धारवाड (कर्नाटक) – ‘हिंदु’ शब्द वापरणार्‍या लिंगायत लोकांना भविष्य नाही.  लिंगायतांमध्ये याविषयी असलेला गोंधळ आधी दूर केला पाहिजे. त्यानंतर धर्म हवा असल्यास लिंगायतांनी ‘हिंदु’ हे पद सोडलेच पाहिजे. जैन आणि शीख यांना आता ‘स्वतंत्र धर्म’ म्हणून मान्यता मिळाली आहे. लिंगायत धर्मालाही स्वतंत्र धर्माची मान्यता मिळेल, हा विश्‍वास असून स्वतंत्र धर्माची मान्यता मिळण्याची पात्रतादेखील आहे; म्हणून हिंदुत्वाला चिकटून न रहाता लिंगायतांनी जागरूक होऊन याविषयी जाणून घ्यावे. या संदर्भात चिंतन झाले पाहिजे, असे विधान बळूर येथील निष्कल मंटपाचे निजगुणानंद स्वामीजी यांनी एका कार्यक्रमात केले. येथील चन्नबसवेश्‍वर नगरातील लिंगायत भवनात अखिल भारत वीरशैव लिंगायत महासभा, धारवाड जिल्हा महासभेने राज्य सरकार पुरस्कृत आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमात १२ वीमध्ये चांगले गुण मिळवलेल्या लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले.

निजगुणानंद स्वामीजी पुढे म्हणाले की, लिंगायतांची सध्याची स्थिती गोंधळाची असून पुढील ४० वर्षांत ती विषम स्थितीला पोचेल; म्हणून आताच लिंगायतांनी जागे होऊन जातीला चिकटून न रहाता स्वतंत्र धर्म म्हणून जोडले गेले पाहिजे. हा अतिशय गंभीर विचार असून लिंगायत धर्माविषयी, तसेच मूळ आशयाविषयी जाणून घेणे अगत्याचे आहे. त्यासाठी अखिल भारत वीरशैव लिंगायत महासभा यांनी नेतृत्व घेऊन मथाधिशांचे चिंतन-मंथन करवून घेण्यासाठी व्यासपीठ निर्माण करणे अगत्याचे झाले आहे.

संपादकीय भूमिका

  • अशा प्रकारची विधाने करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा धोकादायक प्रकार केला जात आहे. याला धर्माभिमानी लिंगायतांनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे ! अन्यथा धर्मांधांकडून हिंदूंचा, पर्यायाने लिंगायतांचाही विनाश झाल्याखेरीज रहाणार नाही !
  • कर्नाटकात काँग्रेसचे राज्य असल्यामुळे त्यांनी पुरस्कृत केलेल्या कार्यक्रमात हिंदुविरोधीच भूमिका मांडली जाणार, यात आश्‍चर्य ते काय ?

(म्हणे) ‘लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळायला हवी !’ – माजी मंत्री बी.आर्. पाटील

माजी मंत्री बी.आर्. पाटील म्हणाले की, वीरशैव लिंगायत समाजाची स्थापना वैज्ञानिक पायावर झाली आहे. त्याला धर्म मान्यता मिळायला हवी. समाज आर्थिक अभिवृद्धीसाठी अधिकोष स्थापन करण्याविषयी विचार चालू आहे.

संपादकीय भूमिका

राजकीय लाभासाठी अशा प्रकारची मागणी करणारे हिंदुद्रोही राजकारणी !