दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सोन्याच्या साखळीची चोरी !; जगभरातील आलिशान घरांच्या सूचीत मुंबई चौथ्या क्रमांकावर… सार्वजनिक शौचालय उपलब्ध नाही… रसायनांच्या आस्थापनात भीषण आग… उपोषण मागे घेतल्याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांचे आभार…

सोन्याच्या साखळीची चोरी ! 

मुंबई गुन्हेगारीमुक्त कधी होणार ? 

मुंबई – सकाळी चालण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीला पोलीस असल्याचे भासवून दोघांनी गळ्यातील सोन्याची साखळी चोरली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


जगभरातील आलिशान घरांच्या सूचीत मुंबई चौथ्या क्रमांकावर ! 

मुंबई – ‘नाइट फ्रँक इंडिया’ने जगातील ४६ आलिशान शहरांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात जगभरातील आलिशान घरांच्या वाढत्या किंमती पहाता ‘टॉप ५’ शहरांच्या सूचीत भारतीय शहरांची नावे आहेत. त्यात मुंबईचा समावेश आहे.  या शहरांमध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा चौथ्या क्रमांकावर समावेश आहे. जुलै ते सप्टेंबर २०२३ या तिमाहीत येथील आलिशान घरांच्या किंमतीत वाढ झाली आहे.


सार्वजनिक शौचालय उपलब्ध नाही ! 

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतर मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे हे लज्जास्पद ! 

नवी मुंबई – नवी मुंबईतील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात सार्वजनिक शौचालयाची सुविधा नाही. त्यामुळे कामानिमित्त येणार्‍या महिला कर्मचार्‍यांना अडचण येते. औद्योगिक वसाहतीत येणारे ट्रकचालक आणि वाहक, कर्मचारी उघड्यावरच प्रातर्विधी करत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. ई-टॉयलेटलाही टाळे ठोकण्यात आलेले असल्याने महिलांची गैरसोय होते.


रसायनांच्या आस्थापनात भीषण आग !

महाड – रायगड जिल्ह्यातील महाडच्या ‘एम्.आय.डी.सी.तील ब्लू जेट’ या रसायनांच्या आस्थापनात भीषण आग लागली. यात ११ कामगार अडकल्याची माहिती आहे. आस्थापनातील ५ कामगारांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. घायाळांपैकी तिघांची प्रकृती काहीशी चिंताजनक आहे. गॅस गळतीमुळे आधी स्फोट झाला. नंतर आग भडकली.


उपोषण मागे घेतल्याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांचे आभार ! 

मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी २ नोव्हेंबर या दिवशी उपोषण मागे घेतले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी राज्य सरकारच्या वतीने त्यांचे आभार मानतो’, असे म्हटले आहे. इतकेच नाही, तर सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि मारोती गायकवाड, तसेच माझे सर्व सहकारी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचेही देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर फडणवीस यांनी सामाजिक माध्यमांवर ही पोस्ट प्रसारित केली आहे.