(म्हणे) ‘मनुस्मृतीवर आधारित हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या दिशेने भाजप पावले टाकत आहे !’ – प्रा. श्याम मानव

  • प्रा. श्याम मानव यांना हिंदु राष्ट्राविषयी पोटशूळ !

  • हिंदु राष्ट्र ही संकल्पना ब्राह्मणांना श्रेष्ठत्व देणार्‍या मनुस्मृतीवर आधारित असल्याचेही विधान !

नागपूर – राज्यघटनेने दिलेले न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही ४ मूल्ये केंद्रातील भाजप सरकार उद्ध्वस्त करत असून मनुस्मृतीवर आधारित हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या दिशेने पावले टाकत आहे. हिंदु राष्ट्र ही संकल्पना ब्राह्मणांना श्रेष्ठत्व देणार्‍या मनुस्मृतीवर आधारित आहे; परंतु सर्वांना समान मानणारी राज्यघटना संपल्याविना हिंदु राष्ट्र होऊ शकत नाही, असे विधान अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक प्रा. श्याम मानव यांनी केले.

ते पुढे म्हणाले,

१. राज्यघटनेने दिलेले अधिकार आणि आरक्षण यांमुळे शूद्र अन् अतीशूद्र समाज ताठ मानेने उभा राहू लागला; पण मोदी सरकारने वर्ष २०१४ पासून हे चक्र उलटे फिरवायला प्रारंभ केला.

२. मोदी सरकारने पुरोहितांना बोलावून नवीन संसद भवनात ‘सेंगोल’ (राजदंड) स्थापित केले. एखाद्या सम्राटाच्या राज्याभिषेकासारखा हा कार्यक्रम झाला. हे हिंदु राष्ट्राचे संकेत आहेत. (राजदंड हे सत्याला साथ देण्याचे प्रतीक आहे. असे असतांना सत्तेतील सरकारने त्यासाठी राज्याभिषेकासारखा कार्यक्रम आयोजित केला, तर त्यात चुकीचे काय ? हिंदु राष्ट्राला कुणी कितीही विरोध केला, तरी ते येणारच आहे, हे  प्रा. मानव यांंनी लक्षात ठेवावे ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • हिंदु राष्ट्र हे केवळ ब्राह्मणांसाठीचे राष्ट्र नसून त्यामागे ‘धर्माचरणी, नीतीमान आणि राष्ट्रहितदक्ष प्रजा अन् शासनकर्ते असलेले राज्य’, असा व्यापक हेतू अंतर्भूत आहे; मात्र याविषयी काडीमात्र अभ्यास नसतांना राज्यघटना, मनुस्मृति आणि हिंदु राष्ट्र यांचा संबंध जोडू पहाणारे प्रा. श्याम मानव स्वतःचीच बौद्धिक दिवाळखोरी दर्शवत आहेत !
  •  हिंदु राष्ट्राविषयी पोटशूळ उठणारे प्रा. श्याम मानव जिहादी आतंकवाद्यांच्या ‘गझवा-ए-हिंद’च्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) कटाविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !